राज्यात पावसाचा जोर कमी; काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather | मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाळी हवामान कायम असल्याने अनेक भागांत वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली होती. शनिवारपर्यंत राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. मात्र आता राज्यातील पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असून, रविवारी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या मध्य पाकिस्तान आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ९.६ किमी उंचीवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. या विक्षोभाच्या परिणामामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी, गारपीट आणि वादळी पावसाची नोंद होत आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातही मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाळी वातावरण कायम असून मागील चार-पाच दिवसांत अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा : ‘आम्ही कोलकातापर्यंत पोहोचू’, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मात्र आता पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत असून हवामान विभागाने ७ एप्रिलपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा इशारा दिला आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तर भारतावर ७ ते १० एप्रिलदरम्यान आणखी एका पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. हा प्रभाव आधीपेक्षा अधिक तीव्र असू शकतो. त्यानंतर मात्र पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होईल आणि १२ एप्रिलनंतर अवकाळी पावसाची शक्यता घटून उन्हाळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी त्यानंतर तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
रविवारी परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.





