राधाकृष्ण विखे पाटलांकडून पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक; महाविकासआघाडी निशाणा

शिर्डी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाला पक्के असून त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी साद भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रकट मुलाखतीतून घातली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. मात्र आता प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा विखे पाटलांनी अजित पवारांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (BJP leader Radhakrishna Vikhe Patil praised Ajit Pawar)
वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी नुकतीच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. ज्यात राज्यातील काही नेत्यांची नावे घेत श्रोत्री यांनी, या नेत्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला. अजित पवारांबद्दल विचारले असता विखे पाटलांनी अजित पवार स्पष्टवक्ते आणि शब्दाला पक्के असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी पुन्हा भाजपासोबत येऊन सरकार बनवावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात विखे पाटलांच्या वक्तव्याचे मोठे पडसाद उमटले. ही भाजपची अधिकृत भूमिका नसून प्रकट मुलाखतीदरम्यान विखे पाटलांनी प्रश्नाला अनुसरून केलेले वक्तव्य असल्याचे भाजप प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, शिर्डी मतदार संघातील एका लघु उद्योग केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रसार माध्यमांनी त्या वक्तव्याबद्दल विचारले असता विखे पाटलांनी पुन्हा अजित पवारांचे कौतुक करत ते सक्षम नेते असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार आणि मी अनेक वर्षे सोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची धमक मला माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे राज्य अधोगतीकडे चालले असून प्रगतशील महाराष्ट्रासाठी भाजप सरकार गरजेचे आहे. त्यासाठी अजितदादांनी सोबत यावे ही भावना कार्यक्रमातील त्या वक्तव्यामागे होती, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे विखे पाटील म्हणाले की, विधान परिषदेचा निकाल राज्यसभेपेक्षा वेगळा लागणार नाही. विधान परिषदेलाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
- खासदार सुजय विखेंना श्रद्धा व सबुरीचा सल्ला
राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. प्रकट मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार सुजय विखे यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. त्याबाबत बोलताना तरुण वयातन मी देखील अशाच पद्धतीने वक्तव्य करायचो. आमच्या मनात काहीही भावना नसतात. मात्र राजकीय ध्रुवीकरणात वक्तव्याचा विपर्यास केला जातो. कोणाला संधी मिळू नये म्हणून श्रद्धा आणि सबुरीने पुढे गेले पाहीजे, असा सल्ला सुजयला दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले आहे.
- ‘ईडी कार्यालयासमोरील तमाशा ताबडतोब थांबवा’
इडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणे हास्यास्पद असून जर तुमची बाजू सत्याची आहे तर घाबरण्याचे कारण काय..?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला उपस्थित केला आहे. इडीच्या कार्यालयासमोर सुरू असलेला तमाशा ताबडतोब थांबवला पाहीजे अन्यथा गैरकाभाराचे संशयाचे घर जनतेच्या मनात पक्के होईल. निरपेक्षपणे चौकशी यंत्रणेला काम करू दिले पाहीजे, असे विखे पाटील म्हणाले. राहुल गांधीच्या इडी चौकशीमुळे सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनावर विखे पाटील यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.





