मुंबईकरांनी दादागिरी नाकारली! रामदास आठवले म्हणतात, “आम्ही ज्यांच्या सोबत असतो, सत्ता त्यांचीच असते”

Ramdas Athawale : मराठीचा मुद्दा घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ठाकरे बंधूंना मुंबईत अत्तापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार अपयश पदरी पडताना दिसत आहे. युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. महानगरपालिकेतील या मोठ्या अपयशावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ठाकरे बंधूंना चिमटा काढला आहे.
“आम्ही ज्यांच्या सोबत असतो, सत्ता त्यांचीच असते!” असं सांगताना आज पुन्हा एकदा मुंबईकरांनी सरळ दादागिरीला ठाम नकार दिला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिक पार्टी (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी पालिकेच्या निकालात भाजप युतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.
हेही वाचा – भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर ; २० तारखेला नाव येणार समोर
महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. “आम्ही ज्यांच्या सोबत असतो, सत्ता त्यांचीच असते. आज पुन्हा एकदा मुंबईकरांनी सरळ दादागिरीला ठाम नकार दिला आहे. हा विजय केवळ महायुतीचा नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, नेतृत्वावरचा जनविश्वास आणि विकासाची सकारात्मक दिशा या सगळ्यांचे हे यशस्वी फळ आहे”, अशी एक्स पोस्ट आठवलेंनी केली आहे.
महापालिकांच्या निकालात भाजप आणि युतीची आघाडी घेत असल्याचे समोर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मोठ्या हसत एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. उद्धवजी आणि पेंग्विनला, जय श्री राम! अशी कॅप्शनही हा व्हिडिओ शेअर करताना दिली आहे.
भाजपासाठी मुंबईत गोड ‘रसमलाई’ विजय असल्याची प्रतिक्रिया बंगळुरुचे भाजप खासदार आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी दिली आहे. सूर्या यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
दरम्यान, समोर आलेल्या आत्तापर्यंतच्या निकालानुसार, भाजपा आणि शिंदेसेना मुबंईत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. पहिल्यांदाच मुंबईत भाजपाचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईतील पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.




