पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट, रेल्वे स्थानकांवर तब्बल ‘इतक्या’ हजार कॅमेऱ्यांची देखरेख

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येत आहे. विशेषतः मुंबईतील रेल्वे स्थानके आणि परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रभावी देखरेख सुरू केली आहे. यामुळे मुंबईतील दैनंदिन प्रवासी आणि देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 139 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या मार्गांवर दररोज सुमारे 3,200 लोकल फेऱ्या होतात, ज्यामधून 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. याशिवाय, लांब पल्ल्याच्या शेकडो रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगरानी ठेवली जात आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana | ‘२१०० रूपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही’; मंत्री नरहरी झिरवळ यांचं मोठं विधान
सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर पोलीस ताफा वाढवण्यात आला आहे. प्रत्येक लोकल गाडीची श्वान पथकांद्वारे तपासणी केली जात आहे. विशेषतः पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असल्याने तिथे अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी स्थानिक स्तरावरही सक्रियता वाढवली आहे. सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस मित्र, शांतता समिती, प्रवासी संघटना, तसेच रेल्वे कर्मचारी, सफाई कर्मचारी, हमाल आणि बुट पॉलिशवाल्यांशी वैयक्तिक संपर्क ठेवला जात आहे. यामुळे संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टींबाबत तात्काळ माहिती मिळण्यास मदत होत आहे. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला किमान दोन तास क्षेत्रीय ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.