‘दहशतवादाचा नवा चेहरा..देशात ५ लाख पाकिस्तानी मुली… ‘; निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

Nishikant Dubey : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, अटारी सीमेवर पाकिस्तानात परतण्यासाठी लोकांची लांब रांग दिसून आली. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले होते आणि त्यांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले होते. भारतात लग्न झालेल्या महिलांची मोठी संख्याही पाकिस्तानात परतण्यासाठी सीमेवर पोहोचली. आता,भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केले आहे.
निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा आता समोर आला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीयांशी लग्न करून पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात राहत आहेत. आजपर्यंत त्याला भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. निशिकांत दुबे यांनी प्रश्न उपस्थित करत,”घरात घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढायचे? असे म्हटले.
निशिकांत दुबे यांनी एक दिवस आधी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत,”पाकिस्तानी सैन्याने निवडकपणे भारतीयांना, विशेषतः हिंदूंना मारले आहे. मोदी सरकार कोणत्याही किंमतीत याचा बदला घेईल. त्यांनी असेही म्हटले होते की पाकिस्तानने घेतलेला काश्मीरचा भाग कोणत्याही किंमतीत परत घेतला जाईल. पाकिस्तानचे विभाजन करून, बलुचिस्तान, पश्तूनिस्तान आणि पंजाब हे वेगळे देश बनतील.
हेही वाचा – पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट, रेल्वे स्थानकांवर तब्बल ‘इतक्या’ हजार कॅमेऱ्यांची देखरेख
निशिकांत दुबे यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी हे करतील. जर या वर्षानंतर पाकिस्तानचे अनेक तुकडे झाले नाहीत, तर लोक असे म्हणण्यास मोकळे होतील की भाजपचे लोक खोटे आश्वासन देतात. पाकिस्तान संपेल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर भारताने कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसाही रद्द केले.
सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले होते, ज्याची अंतिम मुदत आता संपली आहे. भारत सरकारने देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर, पाकिस्तानात परतण्यासाठी अटारी सीमेवर लांब रांगा लागल्या. सीमा ओलांडण्यासाठी लोक तासन्तास रांगेत उभे राहून वाट पाहत होते. त्यापैकी, पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या आणि सीमेपलीकडे लग्न केलेल्या महिलांची संख्या मोठी होती.