HSRP बसवणाऱ्या केंद्रांकडून लूटमार; परिवहन विभागाकडून थेट कारवाई

मुंबई : राज्यातील जुनी वाहने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले. अनेक वेळा यासाठी मुदतवाढदेखील देण्यात आली आहे. दरम्यान, एचएसआरपी बसवणाऱ्या केंद्रांकडून वाहनचालकांची लुटमार सुरु असल्याचे समोर आले आहे. काही केंद्रांकडून वाहनचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. दरम्यान, परिवहन आयुक्तालयाकडून मिरा-भाईंदर परिसरातील मिश्रा मीटर्स या फिटमेंट केंद्रावर थेट कारवाई करत ठाळे ठोकण्यात आले आहे.
सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात एचएसआरपी बसवण्यासाठी परिवहन विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक वाहन चालकांकडून फिटमेंट केंद्रावर जास्त रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार परिवहन विभागाने तपासणी सुरू केली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मिश्रा फिटमेंट केंद्रावर ५० रुपये अतिरिक्त आकारणी करत असल्याची तक्रार परिवहन आयुक्तालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार केंद्रावर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तक्रारीत तथ्य दिसून आले. संबंधित फिटमेंट केंद्रावरून ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली असून त्याचे केंद्र बंद करण्यात आले आहे. अधिक रक्कम आकारणाऱ्या राज्यातील तीन केंद्रांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
सध्या राज्यातील ७७.७ लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. अपघातग्रस्त, गुन्ह्यात जमा झालेल्या, भंगारात काढलेल्या गाड्यांच्या ‘एचएसआरपी’बाबत स्पष्ट तरतूद नाही.





