उष्णतेचा परिणाम असंघटीत महिलांवर सर्वाधिक; उष्णता कृती नियोजनासाठी टाटा ट्रस्टचा पुढाकार

मुंबई : शहरातील गरीब, असंघटीत कामगार आणि महिलांवर उष्णतेचा परिणाम सर्वाधिक होत असून केंद्र-राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उष्णता कृती नियोजनाकरिता टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
उष्णतेचा परिणाम सर्वांवर सारखाच होतो, या सर्वसाधारण समजुतीला छेद देणारी मांडणी करत उष्णतेचा शहरी गरीब, असंघटित कामगार आणि महिलांवर सर्वाधिक परिणाम होत असल्याचे निरीक्षण टाटा ट्रस्टला नोंदवले आहे. पत्रे, ॲस्बेस्टॉस, काँक्रीट यांसारख्या उष्णता अडवून ठेवणाऱ्या साहित्याने बांधलेली घरे, त्यात खेळत्या हवेचा अभाव, उपजिवीकेसाठी करावी लागणारी श्रमाची कामे, घरकाम, यांमुळे महिलांना सतत आणि तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो, अशी माहिती टाटा ट्रस्टच्या शहरी दारिद्र्य निर्मूलनच्या प्रमुख शिखा श्रीवास्तव यांनी दिली. ‘अटलांटिक कौन्सिल’च्या एका अभ्यासाचा संदर्भ त्यांनी दिला. यानुसार २०५० पर्यंत भारतीय महिलांमध्ये उष्णतेशी संबंधित मृत्यूंची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.
टाटा ट्रस्ट आणि ‘आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट’ला मीरा-भाईंदर आणि चंद्रपूरमध्ये काम करताना या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभवही आला. यात ‘थर्मल मॅपिंग’सारखी साधने वापरून शहराच्या कोणत्या भागात उष्णता सर्वाधिक तीव्र आहे हे शोधले गेले. तसेच, ‘हायड्रोजिओलॉजिकल’ (जल-भूशास्त्रीय) मूल्यमापनांच्या मदतीने, त्या तीव्र उष्णतेमागे कारणीभूत असलेले मूळ घटक शोधण्यासही मदत झाली. यानुसार गरीब वस्त्यांमध्ये लक्षणीयरीत्या जास्त उष्णता जाणवली. अनेकदा इथले वातावरण बाहेरच्या पेक्षा तीव्र उष्ण असते. याचा सर्वाधिक त्रास स्त्रिया आणि मुलांना होत असल्याचे दिसून आले.
गुजरामधील महिलांनी, उन्हाळ्यात निर्जलीकरणामुळे सतत थकवा, तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्यात जलस्रोत कोरडे पडल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागते. याचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याची निरीक्षण श्रीवास्तव यांनी नोंदवले. ‘द लॅन्सेट’च्या एका अहवालाचा संदर्भ देत त्यांनी, जागतिक स्तरावर उष्णता आणि निर्जलीकरणामुळे मुदतपूर्व प्रसूती आणि गर्भपाताचा धोका वाढल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी
आरोग्याच्या समस्यांबरोबरच तीव्र उष्णतेच्या काळात उत्पादकता घटते, कामाचे तास कमी होऊन, उत्पन्न घटते. उष्णतेच्या लाटा आणि हवामानाशी संबंधित तीव्र हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम झालेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तर वाढती उष्णता, पूर आणि दुष्काळामुळे हवामान असुरक्षितता निर्देशांकानुसार सर्वाधिक असुरक्षित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हे धोके ओळखून टाटा ट्रस्टने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने उष्णता कृती नियोजनासाठी अधिक एकात्मिक आणि आंतरविभागीय दृष्टीकोन विकसित करण्यावर भर दिला आहे.
ट्रस्टने ऑल इंडिया डिझास्टर मिटिगेशन इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने सोप्या, कमी खर्चाच्या निसर्ग-आधारित उपायांवर भर दिला आहे. यामध्ये गरीव वस्त्या, विक्रेत्यांचे क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणी हिरवळ वाढवणे, पावसाचे पाणी साठवणे आणि घरांसाठी थंड छप्पर (कूल रूफ) बसवणे यांचा समावेश आहे.
उष्माघात, निर्जलीकरण, पूर्वसूचना प्रणाली आणि आपत्कालीन प्रतिसादावर भर जलस्रोतांचे संरक्षण, पुनरुज्जीवन करणे, हरित आच्छादन वाढवणे, घरांची रचना सुधारणे आणि कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन करणे गरीब, असंघटीत महिला, कामगार यांची उपजीविका, आरोग्य आणि जीवनाचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक आणि सामुदायिक पायाभूत सुविधांच्या रचनेचा पुनर्विचार करणे, सार्वजनिक शीत जागांसारख्या नवकल्पना रूजविणे टाटा ट्रस्टसारख्या संस्था, शहर, सरकारे, नियोजक, नागरी समाज संघटना आणि समुदाय यांना एकत्र आणणे.





