‘हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न हे म्हणणे चुकीचे’; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पुणे : सरकार विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करीत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती आहे आणि राहील. हिंदीऐवजी अन्य भारतीय भाषा शिकायची असेल तर तसा पर्यायही विद्यार्थ्यांना दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आपण इंग्रजीचे गोडवे गाताना, तिला खांद्यावर घेऊन मिरवताना हिंदीसारखी भारतीय भाषा आपल्याला दूरची का वाटते, याचा विचारही आपण केला पाहिजे, असा सवालही त्यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त फडणवीस पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमकर्मींशी संवाद साधला. नव्या शैक्षणिक धोरणात तीन भाषा अनिवार्य आहेत. त्यात दोन भारतीय भाषा आणि इंग्रजी असा नियम आहे. राज्यात मराठी बंधनकारकच आहे. दुसरी भारतीय भाषा निवडली असती, तर त्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. हिंदीसाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध असल्याने हिंदीचा पर्याय द्यावा, अशी शिफारस शैक्षणिक धोरणासाठीच्या समितीने केली. त्यावरून सरकारने हा निर्णय घेतल्याचे, फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स दिल्लीत पोहोचले, आजपासून ४ दिवस भारत दौऱ्यावर
विद्यार्थ्यांना तेलुगू, मल्याळम, गुजराती किंवा अन्य भारतीय भाषा शिकायची असल्यास त्यासाठी पर्याय दिला जाईल. परंतु त्यासाठी किमान २० विद्यार्थी हवेत, तरच त्याला शिक्षक देणे शक्य आहे. अन्यथा त्यांना ऑनलाइन माध्यमातून किंवा अन्य पर्याय काढून संबंधित भाषेचे शिक्षण देण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. सीमावर्ती भागात अन्य भाषक शिक्षक असतात, तिथे द्विभाषा शिक्षण पद्धतीही असते. तिथे वेगळा निर्णय घेता येईल,असे फडणवीस यांनी नमूद केले.
आपण हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करतो. इंग्रजीसारख्या परदेशी भाषेचे गोडवे गातो, तिला खांद्यावरून मिरवतो. आपल्याला इंग्रजी जवळची आणि हिंदीसारखी भारतीय भाषा दूरची का वाटते, याचा विचार आपण करणे गरजेचे आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.