‘त्याने’ २० रुपयांचा वडापाव १५ रुपयांना मागितला, त्यावरून वाद झाला आणि पुढे घडले भयंकर

नगर |
खरेदीसाठी गेल्यावर वस्तूचा भाव करताना ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद होतच असतात. मात्र, अहमदनगरमध्ये वडापावच्या गाडीवर पाच रुपयांसाठी अशी हुज्जत घालणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. ग्राहकाने २० रुपये इतक्या किमतीचा वडापाव पंधरा रुपयांना द्यावा, अशी मागणी केली. त्यावरून दोघांत प्रथम बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. यात गाडीचालकाच्या मदतीला त्याचे सहकारीही धावून आले. त्यामुळे मारहाणीत ग्राहक तरुण गंभीर जखमी झाली. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
अहमदनगरच्या एमआयडीसी भागातील नवनागापूर येथे ही घटना घडली. प्रवीण रमेश कांबळे (वय ३५ रा. बालिकाश्रम रोड, नगर) असे मृताचे नाव आहे. वडापाव विक्रेता व साथीदारांनी केलेल्या मारहाणीत ग्राहक प्रवीण रमेश कांबळे याचा मृत्यू झाला आहे. कांबळे हा नवनागापूर येथे एका वडापावच्या गाडीवर वडापाव घेण्यासाठी गेला होता. विक्रेत्याने एका वडापावचा भाव २० रुपये इतका सांगितला. कांबळे याने पंधरा रुपयांत देण्याची मागणी केली. त्यावरून वाद वाढत गेला. दोघेही हमरातुमरीवर आले. शिवीगाळ, धक्काबुक्कीही झाली.
हा वाद वाढत गेला. वडापावचा गाडी चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कांबळे याला मारहाण केली. त्यामध्ये कांबळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. प्रवीण कांबळे याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.





