कृष्णा कारखान्याच्या पाणी योजनांचे आधुनिकीकरण करणार : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

कृष्णा कारखाना उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार
सांगली | संजय पाटील
कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडून शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाईल, अशी घोषणा कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली. लवकरच कारखाना मालकीच्या आणि पुरस्कृत उपसा जलसिंचन योजनांचे आधुनिकरण करणार आहोत. याला शासनाचा मदतीचा हात मिळाला तर शेतकऱ्यांना कमीत कमी पाणीपट्टी भरावी लागेल असा मोठा दिलासा सभासदांना त्यांनी यावेळी दिला.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कृष्णा बँकेचे अध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, दिपकराव पाटील, संजय पाटील, अविनाश खरात, संभाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने गेल्या दहा वर्षात सभासदांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यावर्षी उच्चांकी दर दिला. त्यामुळे सभासद समाधानी आहेत. मयत ५ हजाराहून अधिक सभासदांचे शेअर्स हस्तांतरित केले आहेत. राहिलेलेही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लवकरच करू. ज्या सभासदांनी अन्य विल्हेवाट करून ऊस घातला त्या सभासदांनाही मोफत साखर दिली जाईल. कारखान्याने या हंगामाच्या गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर गाळप सुरू केले जाईल.
गरज पडल्यास आणखी विस्तारीकरण करू…
कृष्णा सहकारी साखर कारखान्याने विस्तरीकरण केल्याने कारखान्याची गाळप क्षमता साडेसात हजारावरून साडेबारा हजार टनापर्यंत गेली. त्यामुळे वेळेत ऊस जाण्यास मदत होणार आहे. गरज पडल्यास आणखी विस्तारीकरण करू.
आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या दहा वर्षात संचालक मंडळांने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे कृष्णा कारखाना ऊस दरात राज्यात अव्वल आहे. आता कारखान्याची निवडणूक लागणार असल्याने काहीजण कारखान्यावर कर्ज झाले आहे असा खोटा प्रचार करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. माजी अध्यक्षांनी कारखान्याची काळजी करू नये, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय दिवे लावले ते आधी पहावे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व गावातील पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. पाणी योजनांचे कारखाना आधुनिकरण करणार आहे..याला शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा सुरु आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कमीत कमी पाणीपट्टी भरावी लागेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : ज्ञान कधीही निराश होऊ देत नाही; राज मुच्छाल
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी स्वागत केले, लिंबाजी पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. भाजपाचे नेते प्रसाद पाटील, कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, माजी संचालक माणिकराव पाटील दादासाहेब पाटील, संदीप पाटील, भगवानराव पाटील, आदींसह संचालक,अधिकारी कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
ऊसदरात राज्यात अव्वल… एफआरपी पेक्षा १३४ कोटी जादा दिले
आमदार अतुल भोसले म्हणाले, कारखान्याचे यापूर्वीचे सत्ताधारी आम्ही काय केले असे विचारत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, कारखान्याने दहा वर्षात एफआरपी पेक्षा १३४ कोटी रुपये जादा शेतकऱ्यांना दिले आहेत. शिवाय ६९ कोटी रुपयांची मोफत साखर वाटली आहे. भविष्यातही कारखाना सभासद हिताचे अधिक चांगले निर्णय घेईल. एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने कारखान्याला आयकर विभागाची नोटीस आली होती. केंद्र सरकारला विनंती केल्यामुळे ५०० कोटींचा आयकर माफ झाला.
सभासदांना दिलासा देणारी आकडेवारी…
आ. भोसले यांनी मांडलेले आर्थिक हिशेबही लक्षणीय आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,
कारखान्याने दहा वर्षांत एफआरपीपेक्षा एकशे चोपन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना दिला.
एकोणसत्तर कोटी रुपयांची मोफत साखर वाटप करण्यात आली.
एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यामुळे आलेली आयकर विभागाची पाचशे कोटी रुपयांची नोटीस केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे रद्द झाली.





