देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं, जेवण करावं आम्हाला…”

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात हिंदीचा मुद्दा रविवारपर्यंत चर्चेत होता. पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि विरोधकांनी टोकाचा विरोध दर्शवला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचंही ठरवलं होतं. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १६ एप्रिल आणि १७ जूनचे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच तुम्ही जीआर रद्द केला अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
“मी एखादा निर्णय घेतला तरीही दोन भावांना एकत्र यायचं आहे तर मी काही असा जीआर काढला आहे का? की दोन भावांनी एकत्र येऊ नये? उद्ध ठाकरेंच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता जो अहवाल लिहण्यात त्यांचा उजवा हात, त्यांचा विश्वासू नेता होता. त्यांनी लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा, तो अहवाल उद्धव ठाकरेंनी त्यावेळी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि नेहमीप्रमाणे घूमजाव केलं. पण आम्हीही कुठलाही अहंकार न बाळगता निर्णय घेतला. मी पुन्हा सांगतो आम्ही निर्णय केला आहे. आता समिती स्थापन केली आहे. समिती ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित बघणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांचं हित बघू, विद्यार्थ्यांचं हित हेच आमचं लक्ष्य आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ब्रह्मोसपेक्षाही घातक, रडारला देणार चकवा, भारत करणार K-6 क्षेपणास्राची चाचणी
मला अतिशय आनंद आहे जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील. मी कालच म्हटलं की आम्हाला राज ठाकरे जो प्रश्न विचारतात तो प्रश्न एकदा त्यांनी उद्ध ठाकरेंना विचारावा. दोन भाऊ एकत्र येवोत, क्रिकेट खेळा, हॉकी खेळा, स्विमिंग करावं, जेवणं करावं आम्हाला काहीही अडचण नाही. हे सगळे दुटप्पी लोक आहेत, यांचं सत्तेतलं रुप वेगळं असतं, विरोधातलं वेगळं असतं, खासगीतलं आणखी वेगळं असतं. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते आहे. मंगळवारी यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली जाईल आम्ही सगळ्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे अशी माहितीही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं कौतुकही केलं. दरम्यान त्यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता आपल्या खास शैलीत या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलं.