दहिसर ते काशीमिरा मार्गावर डिसेंबर अखेर मेट्रो सुरू
मीरा-भाईंदरवासीयांसाठी मेट्रो सज्ज
मुंबई : दहिसर ते काशीमिरा मार्गावर येत्या डिसेंबरअखेर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासीयांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत ‘महामेट्रो’चे अधीक्षक अभियंता, सल्लागार, कंत्राटदार उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, की या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून २००९मध्ये निवडून आलो, त्या वेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. मागील १४ वर्षे त्यासाठी पाठपुरावा केला. त्याला आता यश मिळताना दिसत आहे.
हेही वाचा : “..तर फडणवीस आणि भाजपाने शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी”; उद्धव ठाकरे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरचे नागरिक मेट्रोने अंधेरीपर्यंत जातील. तसेच एअरपोर्ट टी-१ वरून मेट्रो तीनचा वापर करून ते थेट कुलाब्यापर्यंतही जाऊ शकतील, असे सरनाईक यांनी सांगितले.
नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबरअखेर या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वर्षभरात बोस मैदानापर्यंत!
दहिसर-काशीमिरा मेट्रो डिसेंबर २०२६पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई-विरार मेट्रो लाइनचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई-विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.




