Association of Indian Universities । भारतीय उच्च शिक्षणाची आता आत्मनिर्भरतेकडे झेप !
शिक्षण विश्व: ‘एआययू’च्या १०० व्या महासभेला पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित भारतीय विद्यापीठ संघ (AIU) ची ऐतिहासिक १०० वी वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. “विकसित भारत २०४७” या संकल्पनेवर आधारित या तीन दिवसीय परिषदेने भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. (Association of Indian Universities)
देशभरातील कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. उच्च शिक्षणाच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा, विचारमंथन आणि अनुभवांची देवाणघेवाण या दरम्यान झाली.
सांगता समारंभाला शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलपती डॉ. पी. डी. पाटील, AIU अध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक आणि सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. अतुल कोठारी यांनी ‘स्वावलंबनाचे मॉडेल’ उभे करण्यावर भर देत सांगितले की, विद्यापीठांनी आधुनिकतेसोबत भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन करत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करावी. केवळ चर्चेत न राहता प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरण संवर्धन, मानवी मूल्ये आणि सार्वजनिक आरोग्य यांचा विचार करत शिक्षणाची मांडणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच अभ्यासक्रमांतील परदेशी प्रभाव कमी करून स्वदेशी दृष्टिकोनातून शिक्षण विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी या परिषदेला उच्च शिक्षण क्षेत्रासाठी आत्मपरीक्षणाचा महत्त्वाचा टप्पा संबोधत, नवोन्मेष, समावेशकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सक्षम चौकट उभारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षण, गुणवत्तापूर्ण संशोधन आणि संस्थांमधील सहकार्य यावर भर देत, बदलत्या जागतिक गरजांनुसार शिक्षण प्रणाली सक्षम करण्याचे आवाहन केले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी आणि मान्यवरांचे आभार मानले. ही परिषद भारतीय उच्च शिक्षणाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
“भारतीय विद्यापीठ संघाचे हे १०० वे संमेलन म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रासाठी आत्मचिंतनाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे. ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५’च्या पार्श्वभूमीवर नवोन्मेषाला चालना देणारी, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे.”
– डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ.





