मुंबईत ८५ दिवसांचा ब्लॉक… उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील रेल्वे प्रवाशांना बसणार फटका !

जळगाव : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या ऐतिहासिक आणि जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेकडून सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, फलाट क्रमांक १६ आणि १७ वर तब्बल ८५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाकडे जाणाऱ्या काही गाड्यांवरही होणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी मार्फत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, त्या अंतर्गत फलाट क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, संरचनात्मक दुरुस्ती, ट्रॅक सुधारणा, ओव्हरहेड इक्विपमेंट तसेच सुरक्षिततेशी संबंधित अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत प्रवाशांसाठी अधिक आधुनिक सुविधा, सुरक्षित आणि सुकर प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुमारे ८५ दिवस चालणाऱ्या या ब्लॉकचा फटका प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना बसणार आहे. १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कारण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ वरून प्रामुख्याने अमरावती, अकोला, नागपूर, बल्लारशाह, भुसावळ, जळगाव, नांदेड, लातूर तसेच इतर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सुटतात. ब्लॉकच्या कालावधीत अप मार्गावरील संबंधित सर्व गाड्या दादर किंवा ठाणे स्थानकांवरील अल्पकालीन थांब्यावर संपविण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एक फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत अप मार्गावरील मेल व एक्स्प्रेस गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानक गाठण्यासाठी उपनगरीय रेल्वे किंवा इतर पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे.
हेही वाचा – सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता
दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांमधून गैरसोयीची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः दररोज प्रवास करणारे, विद्यार्थी, नोकरीसाठी मुंबईत येणारे तसेच दूरून येणारे प्रवासी यांना अतिरिक्त वेळ आणि खर्चाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तथापि, रेल्वे प्रशासनाने हे ब्लॉक दीर्घकालीन फायद्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फलाटांची क्षमता वाढण्यासह प्रवासी सुविधा अधिक आधुनिक होणे, सुरक्षिततेत वाढ होणे तसेच ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन साधले जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दादर स्थानकावर संपणाऱ्या गाड्या
१२११२ अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस
११००२ बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस
१२८१९ हावडा–सीएसएमटी एक्सप्रेस
११०२० भुवनेश्वर–सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
२२१४४ बिदर–सीएसएमटी एक्सप्रेस
२२१०८ लातूर–सीएसएमटी एक्सप्रेस
२२१२० मडगाव–सीएसएमटीतेजस एक्सप्रेस




