‘आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात’; नितेश राणेंचं खळबळजनक विधान

Nitesh Rane : राजकारणात वादग्रस्त आणि भडक विधानांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. तुळजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “पावसाळ्यात आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांनी या विधानातून डिनो मोरिया प्रकरणाशी जोडलेले गंभीर आरोप केले आहेत.
नितेश राणे म्हणाले, “डिनो मोरिया प्रकरणात काय कारवाई होतेय, हे पाहायला हवं. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा अर्थातच आदित्य ठाकरे याची अडचण वाढू शकते. त्यामुळे पावसाळ्यात ते जेलमध्ये जातील, अशी शक्यता आहे.”
राणेंच्या मते, डिनो मोरिया कोणासोबत उठबस करत होता, कोणासोबत त्याचे भावनिक संबंध होते, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळेच या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी उद्धव-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा जाणीवपूर्वक पुढे आणल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा – काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. यावरही नितेश राणे यांनी आपली खोचक शैली कायम ठेवत जोरदार खिल्ली उडवली. ते म्हणाले, “आम्ही खूप घाबरलोय! एकाकडे २० आमदार, दुसऱ्याकडे शून्य आणि आमच्याकडे १३२ आमदार! त्यामुळे आम्हाला घाम फुटतोय आणि झोप लागत नाहीये!”
या उपरोधिक वक्तव्यातून राणेंनी या संभाव्य युतीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा स्पष्ट संकेत दिला. त्यांनी यामध्ये आणखी भर घालत सांगितलं की, “हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड रसातळाला गेला आहे. त्यामुळे ही युती म्हणजे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.”