शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! कर्जमाफीची तारीख समोर, CM फडणवीसांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. आता लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे. आज पुण्यातील कृषी महाविद्यालयात सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बाबत माहिती दिलेली आहे. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे.
काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी जून महिन्यात सरकार कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आज पुण्यातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, यावेळी फडणवीसांनी म्हटले की, ‘कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ‘
हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी! अपात्र महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले की, ‘अजित दादा पवार आपल्यामध्ये नाहीत, शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालासा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्री यांची भूमिका आहे.
पुढे बोलताना भरणे यांनी म्हटले की, पूर्वीचे अनुदान वाटप आणि आताचे अनुदान वाटप यात खूप फरक आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी शेतकऱ्यांना वीज सवलत दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्तवाचे निर्णय घेणारी ही मंडळी आहे. शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत राज्य सरकारने केली. एआयचे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. लवकर कर्ज माफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील. खताच्या पुरवठ्याबाबत थोडी अडचण आहे, तीही सोडवली जाईल.





