आढळराव पाटील हा काम करणारा माणूस!
जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार : आमदार अतुल बेनके
आंबेगाव : सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर मागच्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभावाचा सामना करावा लागला होता. तरीही देखील आढळराव पाटलांनी आपल्या मतदारसंघात आपलं काम सुरू ठेवलं. यातच आता राज्यात पक्ष फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांमध्ये आढळरावांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे आता अजितदादांची सगळी नेतेमंडळी आढळरावांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून बाहेरून आलेल्या नेत्याला तिकीट देऊ नये अशी भूमिका अजितदादांच्या नेत्यांनी घेतली होती. मात्र अजितदादांनी सगळ्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दुर करत आढळरावांसाठी काम करण्याचा आदेश दिला. त्यानंतर सगळेच नेते आता झपाटून कामाला लागले आहेत. यातच एक दिवसापुर्वी आढळरावांनी विलास लांडे यांची भेट घेतली. त्यानंतर विलास लांडे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशातच आता जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीदादांनी सर्वाधिक मत पडणार असा विश्वास आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त करून दाखवला आहे.
यावेळी अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिक शिवाजीदादांच्या पाठीशी उभे राहतील. तीन पक्ष एकत्र असल्यामुळे जु्न्नर तालुक्यातून अधिकतर मते शिवाजीदादांना पडतील. शिवाजी आढळराव पाटील हा काम करणारा माणूस आहे, त्यामुळे ते शंभर टक्के शिरूर लोकसभेतून विजयी होणार आहेत. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. अमोल कोल्हे यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरूवात करून दिली आहे. दोन्ही उमेदवार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार होणार का की शिवाजी आढळराव पाटील कोल्हेंना चितपट करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





