राज्यातील 14 हजार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला पूरग्रस्तांसाठी

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील जनतेसोबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारीही आहेत. या बिकट परिस्थितीची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी राज्यातील 14 हजार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. हा निधी लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष नीलकंठ उगले यांनी दिली आहे.
ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे सप्टेंबर 2025 च्या महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने घेतला आहे. तसेच याबाबतचे निर्णय जाहीर करून महाराष्ट्र राज्य महसूल विभागाचे अपर सचिवांना निवेदन देखील दिले आहे.
हेही वाचा – मराठा समाजाला मोठा दिलासा! सरकारच्या GRवर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यातील बहुतांश भागात ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे शेतीचे व सर्वसामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त स्थितीमध्ये जनतेला धीर देण्याचे काम महसूल विभाग करत आहे. विभाग प्रमुख म्हणुन अतिशय संयमाने प्रभावी उपाययोजना आखत असुन त्यासाठी राज्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी राबविण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत.
दरम्यान, राज्यातील या अस्मानी संकटाला एकजुटीने तोंड देण्यासाठी राज्य शासनाचा एक जबाबदार घटक म्हणुन ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी वर्ग काम करत आहेत. तसेच त्यांची जनतेला समर्थ साथ असणार आहे. इथून पुढेही जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणार आहे. अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिली आहे.





