नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही: राज ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Raj-Thackeray.jpg)
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती रविवारी संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात झाली. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश होता.
वाचा सविस्तर: माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नका; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी ट्विटरवरुन भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणतात, मराठी संस्कृतीची जी महत्त्वाची शक्तिस्थळं आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुदा फक्त महाराष्ट्रातच असावी, असे त्यांनी म्हटले आहे.