लॉकडाऊन संसर्ग रोखण्यात फारसा परिणामकारक नाही – केंद्र सरकार
मुंबई – राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना संसर्ग वाढला असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले असून नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाऊन परिणामकारक नसल्याचे म्हटले आहे.
देशातील काही राज्यांत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथके पाठवली होती. या पथकांनी महाराष्ट्रातील कोरोना प्रसार नियंत्रित करण्याबरोबरच काही उपाययोजनासंदर्भात सूचना केल्या असून केंद्र सरकारला याबाबत अहवाल पाठवला होता. या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनसारख्या उपाययोजना प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्याचबरोबर संक्रमण रोखण्यासाठी, एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असे केंद्राने नमूद केले आहे. बस स्थानके, झोपडपट्टी भाग, रेल्वे स्टेशन यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी राज्य सरकारने रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्सचा वापर करायला हवा. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि घरातच विलगीकरणात आहेत, त्यांचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असेही केंद्राने राज्य सरकारला म्हटले आहे.