बैलगाडी शर्यतीवर लवकरच मार्ग काढू : जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई – बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसेल असा मार्ग लवकरच काढू, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी दिले. शर्यतीसंदर्भात बैलगाडी मालकांनी ना. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिलराव बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. शर्यतीबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यात बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. संविधान आणि घटनेचा आदर करून शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे ना. केदार यांनी सांगितले.
सतेज पाटील म्हणाले, शेतकरी, बैलगाडी मालक आणि विविध संघटनांच्या दृष्टीने शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकर्यांचे आहे. बैलांचा सराव सुरू करण्यासाठी पोलिस अधिकार्यांची तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.