जागतिक महिला दिवस निमित्ताने गुजरातच्या वानसी-बोरसीमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित
पहिल्यांदाच 1 लाख महिलांचा महासागर उसळणार, पंतप्रधान मोदी करणार संबोधित

गुजरात : येत्या 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आहे. या निमित्ताने गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वानसी-बोरसीमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात फक्त आणि फक्त महिलाच उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे 1.1 लाख महिला या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लखपती दीदींना संबोधित करणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. देशभरातील कमीत कमी दोन कोटी महिलांना लखपती बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे.
हा कार्यक्रम पोलिसांच्या क्षेत्रातही नवीन मैलाचा दगड प्रस्थापित करणार आहे. कारण या एवढ्या मोठ्या महा कार्यक्रमाची तयारी पोलिसांना करावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं धनुष्य पोलिस दलाला पेलावं लागणार आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसच या कार्यक्रमाची सुरक्षा पाहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम देशातील आजवरचा आगळावेगळा कार्यक्रम ठरणार आहे.
असा असेल बंदोबस्त
या कार्यक्रमाची जबाबदारी एकूण 2,165 महिला कॉन्स्टेबल, 187 महिला पीआय, 61 महिला पीएसआय, 19 महिला डीवायएसपी, 5 महिला डीएसपी, 1 महिला आयजीपी आणि 1 महिला एडीजीपी सांभाळणार आहे. तसेच या कार्यक्रमाची व्यवस्था राखणार आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यांचा या कार्यक्रमावर वॉच असणार आहे.
हेही वाचा – धनंजय मुंडेंना 30-40 वेळा फाशी देता येईल एवढे पुरावे; मनोज जरांगेंचा दावा
जागतिक महिला दिवस
दरवर्षी जगभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. यावेळी विविध क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. लैंगिक समानतेबाबतची जागरुकता वाढवली जाते तसेच महिलांचं सक्षमीकरण केलं जातं. त्याशिवाय महिलांना देशाच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.
या दिवशी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपलब्धींचा उत्सव साजरा केला जातो. तसेच, त्यांच्या जगभरातील हक्कांसाठी आवाज उठवला जातो. भारताने शिक्षण, आरोग्य सेवा, आर्थिक स्वतंत्रता आणि सुरक्षा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना सशक्त बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.
नारी शक्ति से विकसित भारत
महिलांच्या विकासाची संकल्पना महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वळत असताना, केंद्र सरकारने महिलांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. शनिवार, 8 मार्च रोजी भारत सरकार ‘नारी शक्ति से विकसित भारत’ या थीम अंतर्गत विज्ञान भवन, नवी दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय पातळीवरील परिषद आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करतील. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्य मंत्री सावित्री ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
युनिसेफ आणि यूएन महिला यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसह, सशस्त्र बल, पोलीस आणि विविध प्रमुख क्षेत्रांतील महिलाही या कार्यक्रमात सहभागी होतील. राष्ट्रनिर्माणात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी #SheBuildsBharat अभियान सुरू करण्यात येईल.