धक्कादायक घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले

Bengaluru Mahalaxmi Murder Case | श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना बंगळुरूमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तब्बल २० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. खून झालेल्या महिलेचे नाव महालक्ष्मी असं होतं. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि.२१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली.
बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. कलम १०३ च्या अंतर्गत महालक्ष्मीच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महालक्ष्मी या २९ वर्षीय महिलेचा मृतदेह २० हून अधिक तुकड्यांमध्ये तिच्या राहत्या घरी आढळून आला. तिच्या घरातल्या फ्रिजमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. महालक्ष्मी ही तिच्या घरात एकटीच राहात होती तसंच फॅशन फॅक्टरीमध्ये ती टीम लीडर म्हणून काम करत होती.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार तिसरा हप्ता!
FIR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
महालक्ष्मीची आई मीना राणा यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना या घरातून दुर्गंध आल्याचं समजलं आणि त्यानंतर ही हत्या उघडकीस आली. महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने तिची आई मीना राणा यांच्याशी संपर्क केला. मीना राणा आणि त्यांचे पती हे दोघंही मूळचे नेपाळचे आहेत. ३५ वर्षांपूर्वी ते बंगळुरुत स्थायिक झाले. या दोघांना महालक्ष्मीशिवाय लक्ष्मी, उक्कुम सिंग आणि नरेश अशी तीन मुलं आहेत. त्यापैकी महालक्ष्मीची हत्या झाली आहे. महालक्ष्मी आणि हेमंत दास या दोघांचं लग्न झालं. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले. ऑक्टोबर २०२३ पासून महालक्ष्मी आणि तिचा पती वेगळे राहात आहेत अशी माहितीही मीना राणा यांनी पोलिसांना दिली.
महालक्ष्मी विभक्त झाल्यानंतर वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. त्यावेळी तिचा भाऊ उक्कुम सिंग आणि त्याची पत्नी दीपिका हे दोघंजण तिच्या बरोबर १५ दिवस राहिले होते. मात्र या दोघांचा महालक्ष्मीशी वाद झाला आणि नंतर हे दोघंही मराठहल्ली या ठिकाणी राहण्यास गेले.मीना राणा यांनी सांगितलं आहे की मी माझ्या मुलीकडे बऱ्याचदा जायचे. ती बरी आहे ना? तिची काळजी ती घेते आहे ना? हे मी बघायचे. मात्र त्या दिवशी तिच्या भावाला म्हणजेच उक्कुम सिंगला कुणीतरी सांगितलं की महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येते आहे. त्याने आम्हाला कळवलं. पण तेव्हा संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. त्यामुळे आम्ही विचार केला की आज ऐवजी उद्या जाऊ. शनिवारी म्हणजेच २१ सप्टेंबरला आम्ही महालक्ष्मीच्या घरी गेलो तेव्हा दार बाहेरुन बंद होतं. अशी माहितीही मीना राणा यांनी पोलिसांना दिली.





