पुण्यातील जिवलग मित्रांचा पेहलगाव हल्ल्यात मृत्यू! दहशतवाद्यांनी गाठली क्रौर्याची सीमा…

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर काल रात्रीच गृहमंत्री अमित शाह श्रीनगरसाठी रवाना झाले. अमित शाह यांनी नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच आज अमित शाह पहलगामची पाहणी करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील दोन जिवलग मित्रांचा यामध्ये समावेश आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे असं हल्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह संध्याकाळी पुण्यात आणणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंशी एका मराठी वृत्तवाहिनीने संवाद साधला. त्यावेळी त्यांना ते फिरण्यासाठी तिकडे गेल्याचं माहिती नव्हतं, पण हल्ला झाल्यानंतर त्यांच्या सूनेने त्यांना याबाबतची माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं आहे.
कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूं पुढे बोलताना म्हणाल्या की, आमचा त्यांच्यासोबत काहीही संपर्क झालेला नव्हता. मला तो फिरायला गेला आहे आणि त्याच्यावरती हल्ला झाला हे माझ्या मोठ्या सूनेने मला सांगितले. घरातील कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कौस्तुभच्या बायकोचा फोन आला होता. तो सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. तो घरी आला होता, तेव्हा मी जाणार आहे फिरायला तिकडे, असं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं. मी आता नाहीये इकडं तेवढंच बोलला, असं कौस्तुभच्या काकूं म्हणाल्या.
हेही वाचा – पुण्यात एकाच दिवशी 2 आगीच्या मोठ्या घटना; अग्निशमन दलाची पुरती दमछाक, अनेकांचे संसार उद्ध्वस्त
कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी सुरक्षित आहे, आम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं नेमकं काय झालंय. आम्ही नवरा बायको असतो, त्यामुळे घरातील कोणीच आम्हाला सांगत नव्हते, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे देखील आम्हाला मुलासारखा होता. घरातील सदस्यासारखा होता,असंही कौस्तुभ यांच्या काकूंनी यावेळी सांगितलं.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच पनवेल खांदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला आहे. तर सुभोद पाटील आणि माणिक पाटील हे या हल्ल्यात जखमी झाले. दोघांवर जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू असून राज्यातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर गेला आहे.