Sathankulam Custodial Deaths: हा अतिदुर्मिळ गुन्हा! हायकोर्टाकडून 9 पोलिसांना फाशीची शिक्षा!
देशभर गाजलेल्या प्रकरणात अखेर निकाल : सहा वर्षांनी न्याय झाला
चेन्नई: २०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं या प्रकरणात तमिळनाडू पोलीस दलातील ९ जणांना दोषी धरलं आहे. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं आहे. पोलिसांनी केलेला गुन्हा अतिशय निर्घृण असल्याचं न्यायालयानं निकालात नमूद केलं आहे.
या प्रकरणी सहा वर्ष सुनावणी चालली. प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन यांनी या प्रकरणी निकाल दिला. त्यांनी सगळ्या नऊ आरोपींना हत्या आणि अन्य संबंधित कलमांच्या अंतर्गत दोषी धरलं. हे प्रकरण आत्यंतिक क्रूरता आणि सत्तेच्या दुरुपयोगाचं उदाहरण असल्याचं न्यायमूर्तींनी निकालात म्हटलं.
बाप-लेकाला पोलीस ठाण्यात रात्रभर मारहाण
ही घटना तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलमशी संबंधित आहे. इथे राहणारे व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. दोघांना १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी करोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु होता. ल़कडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बाप लेकाला ताब्यात घेतलं होतं. मोबाईल ऍक्सेसरीजचं दुकान ठरलेल्या वेळानंतरही सुरुच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
पोलीस कोठडीत बाप, लेकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं. संपूर्ण रात्र त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाला. हेच त्या दोघांच्या मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेनंतर देशभरात आक्रोश पाहायला मिळाला. पोलीस कोठडीत होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. न्यायाची मागणी जोर धरु लागली आहे. प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सहा वर्षांनी न्याय झाला; ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
बाप लेकांचा पोलीस कोठडीत झालेला छळ पूर्वनियोजित होता. हा छळ रात्रभर चालला, या बाबी सीबीआय तपासातून समोर आल्या. आरोपींनी जाणूनबुजून हा गुन्हा केला. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली. ही मागणी न्यायालयानं मान्य केली. या प्रकरणात नऊ पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं. त्यात निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबतच मुख्य हवालदार एस. मुरुगन आणि ए. समदुरई, हवालदार एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस, एस. वेलुमुथु यांचाही समावेश आहे.





