नरेंद्र मोदींचे धक्का तंत्र, युद्धापूर्वीच यशाचा मंत्र !

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पटापट निर्णय घेतले. प्रत्यक्षात अजून कोणतीही कारवाई झालेली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धक्का तंत्र पाहून पाकिस्तानची गाळण उडाली आहे. अर्थात् युद्धनीतीमध्ये अशा प्रकारच्या धक्का तंत्राला फार महत्त्व असते, आणि ते नरेंद्र मोदी यांनी अचूक साधले आहे!
युद्ध सुरू होण्यापूर्वीच जिंकले..
पाकिस्तानबरोबर प्रत्यक्ष युध्द सुरु होण्यापूर्वीच ते जिंकायचे असेल तर शत्रूच्या मनात धडकी भरवण्याइतका उत्तम उपाय दुसरा नाही. त्यामुळे शत्रूचे मनोधैर्य एकदम कोसळते आणि युध्दे मनोधैर्यावरच तर जिंकली जातात! कसलेला सेनानी आणि मुत्सद्दी नेता नेहमीच या शस्त्राचा वापर करत असतो.
इतिहास ‘संताजी-धनाजी’ चा !
औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यात संताजी- धनाजी दिसत होते, असे म्हटले जाते, ते याच ‘धडकी’ तंत्रामुळे..शत्रूला गोंधळात टाकणे हाच या धडकी तंत्राचा पाया असतो. हा वारसा खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा.. आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज पळाले, तर ‘ते कसे पळाले?, खिडकीतून पळाले की दरवाजातून पळाले?, जमिनीतून गेले की आकाशातून गेले?’ असे आक्रस्ताळी अकांडतांडव औरंगजेबाने केले होते, असे म्हणतात. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून महाराज निसटले तेव्हा सिद्दीने महाराजांच्या पाठलागावर सैन्य पाठवले, पण तो स्वतः वेढ्यातच थांबला. कारण ‘पळाले कोणी दुसरेच असेल आणि खरे महाराज गडावरच असतील’ असे त्याला वाटले होते.
बेसावध शत्रू, अचूक कामगिरी!
शत्रूला बेसावध ठेवणे, आपल्या डावपेचांचा थांगपत्ता त्याला न लागू देणे आणि त्याला सतत अस्थिर ठेवणे हे सर्वाधिक महत्वाचे असते. भाजपमध्ये मोदी – शाहांशिवाय कुणालाच काही माहीत नसते, अशी एक कुत्सित टीका नेहमी होते. पण, युध्दाच्या कारवाईच्या संदर्भात ही गोपनीयता हा खरा गुण ठरतो. अर्थात् सामर्थ्य असेल तरच शत्रूच्या मनात अशी धडकी भरवता येते आणि बिथरलेला शत्रू भांबावून नको ते उपाय योजण्यात अडकतो. लक्षात घ्या, मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची अशीच भंबेरी उडाली आहे!
हेही वाचा – श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
कुठे, कसे आणि केव्हा ?
युध्द कुठे, कसे आणि केव्हा करायचे, हे जो सेनापती यशस्वीपणे ठरवू शकतो, तोच युध्द जिंकू शकतो, असा युध्दशास्त्रातला दुसरा नियम आहे. आपल्याला अनुकूल असेल, त्या ठिकाणी शत्रूला यायला भाग पाडणे आणि आपण ठरवलेल्या वेळेला त्याच्यावर हल्ला करणे, ही युध्द जिंकण्याची पहिली पायरी आहे. बाजीराव पेशव्यांनी पालखेडच्या लढाईत नेमके हेच सूत्र अवलंबिले होते.अशा डावपेचात नेपोलियन तज्ज्ञ होता, हे इतिहास सांगतो.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे नियोजन चुकीचे..
आता, पहलगाममधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीशी वरील निकष ताडून पाहू. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशातील वीस राज्यांमधील नागरिक मृत्युमुखी पडले. परिणामतः संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांची चूक झाली, ती इथेच! आपोआपच सगळा देश एकवटला. या हल्ल्याचा परिणाम एवढा जबरदस्त होता, की वक्फ विरोधातील आंदोलन विरले. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील बोलण्याची दखलही भारतीयांनी घेतली नाही. म्हणजे त्यावरुन रान माजवण्याचे त्यांचे मनसुबे वाया गेले. उध्दव आणि राज ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या फालतू बातम्या पाचोळ्या सारख्या उडून गेल्या. आता, एकत्र येण्यापेक्षा कोण आधी मोदींना पाठिंबा देतो, याची स्पर्धा या दोन नेत्यात येत्या काही दिवसात लागली, तर आश्चर्य वाटायला नको.
टीकेऐवजी सहानुभूतीच..
नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असतांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. मोदी नसल्यामुळे गोंधळ माजेल, असा त्यांचा कयास असावा. पण झाले उलटेच. मोदी भारतात असतांना हल्ला झाला असता तर कदाचित टीकेचा रोख मोदींकडे वळला असता. पण, ते परदेशात असल्याने आणि अतिशय महत्वाचा दौरा अर्धवट सोडून परत आल्यामुळे त्यांना सहानुभूतीच मिळाली. आल्या आल्या त्यांनी विमानतळावरच आढावा बैठक घेतल्यामुळे त्यांच्या निर्धाराची लोकांना कल्पना आली.
आडाखे चुकले आणि बावचळले !
असे आडाखे चुकले की काय करावे ते कळत नाही आणि निर्णय घेण्यात गफलत होते. पाकिस्तानचं नेमके तसेच झाले आहे. भारत प्रतिहल्ला करणार हे नक्कीच, पण तो कुठे प्रतिहल्ला करेल, याचा पाकिस्तानला अंदाज येत नाही, त्यामुळे त्यांची त्रेधा उडाली आहे. भारताचे लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर आहे, असे वाटून पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने कराचीहून उत्तरेकडे नेली. उत्तरेकडील आणि काश्मीर, पंजाब लगतच्या सीमेवरील कुमक वाढवली. पण, भारताने अचानक आय. एन. एस. सुरत या युध्दनौकेवरुन एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या केली. म्हणजे आता भारत उत्तरेतून घुसणार की समुद्रमार्गे हल्ला करणार, असा भ्रम निर्माण झाल्याने पाकिस्तान अधिकच बावचळला.
पाकची भूमिका पायावर दगड पडण्यासारखी..
भारताने सिंधु पाणी वाटप करार स्थगित केला तर त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने सिमला करार रद्द करण्याची हास्यास्पद धमकी दिली. आता, सिंधु करार स्थगित करुन भारताने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले. पण, सिमला करार रद्द झाल्याने असे काय बिघडणार आहे? तो करार मोडून पाकिस्तानने काश्मीरचा प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर नेला तरी काय बिघडणार आहे? आणि तसेही पाकिस्तानला जगात आता शून्य किंमत उरली आहे. तुर्कस्थानशिवाय त्याला कोणी विचारत नाही.
पाकिस्तानची जागतिक पत संपली..
पाकिस्तानची जगाच्या बाजारातील पत नाहीशी करणे, हीच तर मोदींच्या पाकविरोधी धोरणाची पहिली पायरी होती. मोदी आज त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत.
पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाईजागा बंद केली आहे. भारतही तसेच प्रत्युत्तर देईल. यात नुकसान पाकिस्तानचेच आहे. पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीतून बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड या देशांना जाऊ शकणार नाहीत. यात बांगला देशाचा जास्त कोंडमारा होणार आहे. वाहतुकीचा वाढता खर्च पाकिस्तानला अजिबात परवडणार नाही.
मोदींचे एका दगडात अनेक पक्षी..
आज पाकिस्तानचा शेअरबाजार कोसळला, तो यामुळेच. एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या कलेत मोदींचा हात कोणी धरू शकणार नाही, हेच खरे. भारतात हे राहुल, सोनिया, पवार, ठाकरे, अखिलेश यांना जसे समजले, तसेच ते आता पाकिस्तानलाही समजून चुुकणार आहे.
या सगळ्या गोष्टींमुळे पाकिस्तानच्या मनात कमालीची धडकी भरली आहे. भारताने काही कारवाई केली, तर बलुचिस्तान डोके वर काढणार आहे. पुढील पाणीटंचाईच्या भीतीने घाबरलेले पाकिस्तानी आतापासूनच घरात पाण्याच्या बादल्या भरुन ठेवायला लागतील, अशी त्यांची स्थिती आहे.
भारताने फास आवळत आणला..
आता फक्त प्रश्न आहे, तो भारत फटका कुठे मारील हा..! भारताने फास सर्व बाजूंनी आवळत आणला आहे. कुठून तडाखा बसेल याचा पाकिस्तानला अंदाज येत नाही. मोदींनी अर्धी लढाई तर येथेच जिंकली आहे. पुढील लढाईचे उत्तर येत्या एक – दोन दिवसात मिळेल. नरेंद्र मोदी यांची कूटनीती आणि भारतीय लष्कराची युद्धनीती हीच आता महत्त्वाची आहे, पाकिस्तान तर आधीच अर्धमेला झाला आहे, हे नक्की!