प्रत्यक्ष युद्धात पाकिस्तान तग धरणार का मरणार ?

भारत पाकिस्तानच्या सीमेवर युद्धाचे ढग तरंगत आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी संपूर्ण भारतातून मोदी सरकारवर दबाव येत असून भारताची युद्ध यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जर युद्ध झालेच तर पाकिस्तान भारतासमोर किती दिवस तग धरणार का सबसे हाराकिरी पत्करून मरणार हा खरा प्रश्न आहे.
भारताकडून क्षेपणास्त्राच्या चाचण्या !
भारताने युद्धाची जय्यत तयारी केली असून उच्चस्तरीय अनेक बैठका सुरू आहेत. पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी दिलेली मुदतही संपली आहे. भारताची लढाऊ जहाजे समुद्रात पाकिस्तानच्या सीमेजवळ जाऊन उभी आहेत.. आता, पहिले क्षेपणास्त्र सोडण्यासाठी आवश्यकता आहे ती पहिल्या आदेशाची !
हल्ल्यानंतर मुसक्या आवळल्या..
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये २६ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, भारताने पंचप्रहार केले, त्यामध्ये सिंधू नदी कराराला स्थगिती दिली गेली. अटारी-वाघा बॉर्डरदेखील बंद करण्यात आली, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. तातडीने अनेक पावले उचलली गेली.
पाकिस्तानचा फक्त जळफळाट..
सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून ते लष्कर प्रमुखांपर्यंत युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. यामुळे तणावाची स्थिती तर निर्माण झाली आहेच. पण, सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालेच तर पाकिस्तान भारतासमोर किती दिवस टिकू शकते? संरक्षणतज्ज्ञ काय म्हणतात ? भारताच्या लष्करी सामर्थ्याला तोंड देण्याची पाकिस्तानची क्षमता आहे का ? हा मुख्य प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा – श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
पाकच्या संरक्षणतज्ज्ञांना काय वाटते?
पाकिस्तानी संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर चिमा यांनी या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यामागे पाकिस्तानचा असा उद्देश आहे की, भारताच्या कोणत्याच विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश द्यायचा नाही. मात्र, तशी स्थिती निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी चिघळू शकते. दुसरीकडे भारताने सुद्धा तयारी सुरू केलेली आहेच. भारताकडून ‘आयएनएस विक्रांत’ ला समुद्रात तैनात करण्यात आले आहे. भारताच्या हवाईदलाने युद्धाभ्यास सुरू केला आहे. या सर्व गोष्टीवर पाकिस्तान नजर ठेवून आहे, असे चिमा यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान हल्ल्याच्या प्रतीक्षेत..
भारत आज ना उद्या हल्ला करणार याची कल्पना पाकिस्तानला आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि भारताचे हल्ले परतवण्यासाठी संपूर्ण नियोजन आणि तयारी केली आहे, हे सीमा यांचे शब्द बरेच काही सांगून जातात.
प्रकरण गंभीर, प्रचंड तणाव..
भारताकडून युद्धाच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या आहेत, सैन्यांच्या हालचाली आणि त्या संबंधित बातम्या देऊ नका, असे आदेश भारत सरकारने सर्व प्रसार माध्यमांना दिले आहेत. याचाच अर्थ असा, की हे प्रकरण गंभीर आहे. भारत सीमेवर सैन्याची जुळवाजुळव करत असून संख्या वाढवत आहे. या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले तर पाकिस्तान भारतासमोर फार काळ दम धरू शकणार नाही. अर्थात् चिमा यांनीच हे मान्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले आहे की सध्या पाकिस्तानकडे शस्त्र आणि पैसा पुरेशा प्रमाणात नाही, त्यामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालेल असे मला वाटत नाही. भारताला सुद्धा पाकिस्तानची परिस्थिती कशी आहे, हे चांगलेच माहिती आहे, असे चिमा यांनी म्हटले आहे.
एकदा होऊन जाऊ द्या..
दरवेळी पाकिस्तानने काहीतरी आगळीक करायची. पुलवामा, उरी एवढेच काय कारगिल सारखे हल्ले करायचे आणि नंतर भारताने त्यांच्यावर कारवाई करायची हे आता ठरलेलेच आहे. पाकिस्तानचे तोंड कायमचे बंद करा, असे सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले असून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची लष्करी ताकद किती ? याबाबत रोजच चर्चा सुरू असून केवळ तीन दिवस पुरेल एवढा दारूगोळा पाकिस्तानकडे असल्याचे सांगितले जात आहे.
अद्दल शिकवण्याची हीच वेळ !
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अतिशय कडक पावले उचलली आहे, आणि पाकिस्तानवर दबाव टाकण्यासही सुरुवात केली आहे. पाकिस्तानची लष्करी ताकद आपल्या आवाक्याबाहेर नाही हे लक्षात आल्यानंतर भारताचे अधिकारी जास्तच आक्रमक झाले आहेत. आता युद्ध होऊन जाऊ द्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवू या.. असे संपूर्ण भारतीयांचे म्हणणे आहे. आता, पाहू या मोदी सरकार कोणती कडक कारवाई करणार आणि पाकिस्तानला गुडघ्यावर रांगायला लावणार ते !