मुंबईतील हलक्या वाहनांना टोलमाफी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई | मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी दिली आहे. मुंबईच्या वेशीवर एकूण पाच टोल आहेत. या पाचही टोलनाक्यांवर टोल आकारला जातो. आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका असे हे पाच टोलनाके आहेत. या सर्वच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना आता टोलमाफी असेल. अवजड वाहनांना मात्र टोल द्यावा लागेल.
हेही वाचा – Good News : पिंपरीतील भाजी मंडई व्यापाऱ्यांच्या ३५ वर्षांच्या संघर्षाला न्याय!
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल ४५ रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन २००० पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.





