मोदी मंत्रिमंडळाने घेतले 3 मोठे निर्णय: कृषी योजनेपासून ते NTPC पर्यंत; कोट्यवधींच्या गुंतवणुकीला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांमुळे देशाच्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ला मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय, NTPC आणि NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) यांना नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयांमुळे कृषी क्षेत्रातील १०० जिल्ह्यांचा विकास आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक यांना चालना मिळणार आहे.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना –
पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला २०२५-२६ पासून सुरुवात करून पुढील सहा वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील १०० कृषी जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. नीती आयोगाच्या ‘आकांक्षी जिल्हा’ कार्यक्रमापासून प्रेरणा घेत ही योजना विशेषतः कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल.
या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादकता वाढवणे, पीक वैविध्याला प्रोत्साहन देणे, शाश्वत शेती पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवणूक सुविधा वाढवणे आणि सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे यावर भर देण्यात येणार आहे. ही योजना ११ मंत्रालयांच्या ३६ योजनांच्या समन्वयाने राबवली जाईल, ज्यात राज्य सरकारांच्या योजना आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांचाही समावेश असेल. कमी उत्पादकता, कमी पीक चक्र आणि कमी कर्ज वितरण या तीन प्रमुख निकषांवर आधारित १०० जिल्ह्यांची निवड केली जाईल. प्रत्येक राज्यातून किमान एका जिल्ह्याचा समावेश असेल.
NTPC ला नवीकरणीय ऊर्जेसाठी प्रोत्साहन –
मोदी मंत्रिमंडळाने NTPC लिमिटेडला नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात विद्यमान मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच २०,००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. ही गुंतवणूक NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या तसेच संयुक्त उपक्रमांमार्फत केली जाईल. यामुळे २०३२ पर्यंत ६० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
NLC इंडिया लिमिटेडसाठी मोठा निर्णय –
NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) ला ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. ही गुंतवणूक कंपनी आपल्या पूर्ण स्वामित्वातील सहाय्यक कंपनी NLC इंडिया रिन्यूएबल लिमिटेड (NIRL) मार्फत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये करेल. यामुळे कंपनीला संचालन आणि आर्थिक लवचिकता मिळणार आहे. या निर्णयांमुळे देशाच्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल.





