मेक्सिकोच्या ‘टॅरिफ बॉम्ब’ला भारताचे प्रत्युत्तर! ५० टक्के टॅरिफ वाढीनंतर दिला ‘हा’ इशारा

Mexico Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे. अमेरिकेने भारतावर अद्यापही ५० टक्के आयातशुल्क लादले असल्याने याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. यातच आता अमेरिकेनंतर मेक्सिकोनेही भारतासह काही देशांवर ५० टक्के कर लादला आहे. मेक्सिकोने निवडक भारतीय मालावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढीला मंजूरी दिली आहे. यानंतर भारताने आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती एका अधिकार्याने शनिवारी दिली. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
“भारतीय निर्यातदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते उपाय करण्याचा अधिकार भारताने राखून ठेवला असून, या बरोबरच संवादातून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील सुरू ठेवत आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगीतले की, यासंदर्भातील विधेयक सुरुवातीला जेव्हा सादर केले जात होते, तेव्हा भारताची मेक्सिकोबरोबर चर्चा सुरू होती.
हेही वाचा – ‘नागपूर शहराच्या विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“जागतिक व्यापार नियमांशी सुसंगत अशा परस्पर फायदेशीर उपायांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य विभाग मेक्सिकोच्या अर्थ मंत्रालयाशी चर्चा करत आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
भारताचे वाणिज्य सचिव राजेश आग्रवाल आणि मेक्सिकोचे उप-अर्थमंत्री लुईस रोसेन्डो यांच्यात उच्च-स्तरीय बैठक झाली आहे, आणि या मुद्द्यावर पुढे बैठका होणे अपेक्षित आहेत. दरम्यान मेक्सिकोमधील उद्योगाला आणि उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी हे टॅरिफ लादण्यात आले आहे. जे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.
“भारत हा मेक्सिकोबरोबरच्या आपल्या भागीदारीला महत्त्व देतो आणि दोन्ही देशांमधील उद्योग आणि ग्राहकांना फायद्याचे ठरेल असे संतुलित आणि स्थिर व्यापार वातावरण तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सदैव तयार आहे,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.





