‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान

Operation Sindoor | भारतीय हवाई दलाचे प्रमुख एयर चीफ मार्शल एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला मोठे नुकसान केल्याचा मोठा खुलासा केला आहे. बंगळुरू येथे एयर चीफ मार्शल एल.एम. कात्रे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी सांगितले की, या कारवाईत जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या (S-400) साहाय्याने पाकिस्तानचे पाच लढाऊ विमाने आणि एक हवाई देखरेख (AWACS) विमान नष्ट करण्यात आले.
एपी सिंग पुढे म्हणाले की, १० मे रोजी भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. तेव्हा जेकबाबाद हवाई तळावरील अमेरिकन बनावटीची एफ १६ विमाने नष्ट करण्यात आली होती.
हेही वाचा : To The Point | दोन दादांची शर्यत… आणि पुणे-पिंपरीच्या प्रश्नांना चालना!
आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने उत्तम काम केले. आपण अलीकडेच खरेदी केलेली एस-४०० हे उपकरण गेमचेंडर ठरले. या प्रणालीमुळे आपण पाकिस्तानच्या विमानांना दूर ठेवू शकलो. जसे की, त्यांच्याकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बला ते वापरू शकले नाहीत. कारण एस-४०० मुले ते जवळपास येऊ शकले नाहीत.
विमानांव्यतिरिक्त आपण मोठ्या संख्येने युएव्ही आणि ड्रोन्सही नष्ट केले. त्यांची काही क्षेपणास्त्रे आपल्या हद्दीत पडली होती. आम्ही त्याचे अवशेष गोळा केले आहेत. या अवशेषांचा अभ्यास सुरू आहे. जेणेकरून ती कुठून सोडण्यात आली, त्यांनी कोणता मार्ग अवलंबला होता. क्षेपणास्त्र सोडणारी प्रणाली कशी आहे आणि त्याची क्षमता किती आहे, याची माहिती आम्हाला मिळू शकेल, असेही एपी सिंग यांनी सांगितले.





