ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

स्वतंत्र बलुचिस्तानचे ‘स्वप्न साकार’, पाकच्या भूमीचा घटणार आकार !

पाकिस्तानच्या जुलमी जोखडातून स्वतंत्र होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे लढा देणाऱ्या बलुचिस्तानचे स्वप्न अखेर साकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापासून हा प्रदेश कधीच पाकिस्तानशी एकनिष्ठ राहिला नाही आणि गेली सुमारे ७५ वर्षे तो पाकिस्तानच्या हुकूमशाही राजवटीची झुंजत राहिला आहे.

बलुचिस्तानची आशा नरेंद्र मोदी..

भारतामध्ये २०१४ साली भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून बलुचिस्तानची स्वतंत्र राष्ट्र होण्याची आशा पल्लवीत झाली होती आणि त्यांचे सर्व लक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रित झाले होते. भारतात नरेंद्र मोदी यांना ज्या ज्या वेळी यश मिळत होते, त्या त्यावेळी बलुचिस्तानमध्ये मिरवणुका निघत आणि ‘मोदी मोदी’ नाऱ्याचा जयघोष होत असे. आता मोदी सरकारकडून ज्यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली, त्यावेळी त्यांच्या आशा अशाच पल्लवीत झाल्या !

पाक सैनिक हे तर मोठे शत्रू..

बलुचिस्तानवर ताबा राखण्यासाठी आणि तेथील जनतेला नियंत्रणात ठेवण्यासाठी जे सैनिक पाकिस्तानकडून पाठवले जात असत, ते तर या बलोची नागरिकांचे सर्वात मोठे शत्रू ! पाकिस्तानी सैन्याची नुकतीच त्यांनी एक रेल्वे उडवून दिली, त्यात शेकडो सैनिक मारले गेले आणि आता भारताकडून कारवाई होत असल्याचे समजतात त्यांच्या स्वयंघोषित संघटनांनी उचल खाल्ली आणि बघता बघता आपला प्रांत स्वतंत्र केल्याची घोषणा केली..स्वतंत्र बलुचिस्तानला अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नसली तरी हे काम नरेंद्र मोदी करणार याची त्यांना खात्री आहे !

स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा..

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन संपूर्ण परिसराचा ताबा घेतल्याची घोषणा तसेच स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणाही करून टाकली आहे. आमच्या देशाचा दिल्लीत लवकरच दूतावास असेल आणि त्याबाबत संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, असे त्यांनी आपल्या घोषणेत म्हटले आहे. पाकिस्तानला हा आणखी एक दणका असून पाकिस्तान चांगलाच कोंडीत सापडला आहे.

हेही वाचा –  ATM बाबत सरकारकडून बँकांना महत्त्वाचे निर्देश; सायबर अटॅक रोखण्यासाठीही केल्या महत्त्वाच्या सूचना

पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ले आणि ताबा..

एकीकडे भारतीय लष्कराने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे तर दुसरीकडे ‘बलुच लिबरेशन आर्मी’ ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे, ताबा घेतला आहे आणि त्यांच्या नेत्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे, हा पाकिस्तानला मोठा हादराच आहे. आता, पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी चांगलीच जिरणार आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर आता बलुच लिबरेशन आर्मीला सुद्धा सत्तर हत्तींचे बळ आले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

मीर यार बलोच यांची घोषणा..

भारत आणि पाक यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच बलुच लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. सोशल मीडिया एक्सपोर्ट ‘एक्स’ वर त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे, संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहर आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहेत, तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आली आहे. त्यांचा कारभार एखाद्या स्वतंत्र राष्ट्रासारखा सुरू झाला आहे.

स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्या..

संयुक्त राष्ट्र संघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलावावी आणि बलुचिस्तानाला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे. स्वतंत्र व्यवसाय त्यांनी सुरू केला आहेच. पण, स्वतःच्या स्वतंत्र चलनाबाबतही मोठी झेप घेतली आहे.

दिल्लीत दूतावास उघडणार..

या संपूर्ण लढ्याचे नेते मीर यार बलोच यांनी दहशतवादी पाकिस्तानचे पतन आता जवळ आल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानची फाळणी निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास आणि अधिकृत कार्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत भारताच्या नेत्यांमध्ये लवकरच चर्चा सुरू होईल.

पाक लष्कराने भूभाग सोडावा..

पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या सर्वच क्षेत्रातून माघार घ्यावी. हा भूभाग सोडावा, हवाई, समुद्र आणि जमिनीवरील सर्व हालचाली थांबवाव्यात. बलुचिस्तानमधून काढता पाय घ्यावा, तसेच संयुक्त राष्ट्र संघाने त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी लवकरच घेण्यात येईल, असे मीर यार यांनी स्पष्ट केले आहे. या मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय असेल याची त्यांनी हमी दिली आहे. मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांना या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाकला मोठा धडा असेल !

दहशतवाद्यांची फॅक्टरी असणाऱ्या पाकिस्तानला स्वतःच्या ताकदीबद्दल प्रचंड अहंगंड आहे. त्यांची जिरवायची असेल तर भारताने आता पाकव्याप्त काश्मीर मोकळा करावा, बलुचिस्तान स्वतंत्र करावा आणि सिंध प्रांतामध्ये लढा सुरू असल्याने तो भूभागही पाकिस्तानपासून तोडावा.. म्हणजे पाकिस्तानचे एवढे तुकडे झाल्यानंतर त्यांची मस्ती जिरेल आणि दहशतवाद्यांची फॅक्टरी बंद पडेल, अशी मागणी संपूर्ण जगातून होत आहे. त्याला भारत आता कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे मात्र महत्त्वाचे आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button