नवीन संसद भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन नाव द्या – इंद्रेश गजभिये
नागपूर : नवीन संसद भवनाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जावे यासाठी या भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन असे नाव द्यावे, अशी मागणी डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री इंद्रेश गजभिये यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यावेळी एससी, एसटीच्या आरक्षित जागाही लोकसभा व विधानसभांच्या जागा सर्वसमावेशक करण्यात आल्या.
मात्र, आज ७० वर्षानंतर त्या काही लाभ झालेला नाही. आजही आमची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे, असे गजभिये म्हणाले. महापरिनिर्वाण भूमीबाबत कमेटीने केंद्राकडे पाच मागण्या केल्या आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ डिसेंबरला दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रमोद तभाने, दिपक फुलझेले, सुनंदा खैरकर, माधुरी रंगारी आदी उपस्थित होते.
‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासारखे काही नाही
दिल्लीत २२ प्रतिज्ञा म्हटल्यामुळे गदारोळ झाला. त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांनी नागपूरला दीक्षा घेतली, तेव्हापासून आजवर २२ प्रतिज्ञा दीक्षा घेताना म्हटल्या जात आहे. यात गुन्हा दाखल करण्यासारखे काही नव्हते. एवढेच या प्रकरणी सांगू शकतो, असेही गजभिये म्हणाले. मात्र, त्यांनी या घटनेचा निषेध करण्यास नकार दिला.





