काँग्रेसमधील आऊटगोईंग, असेच सुरू राहणार का ?

पुण्यातील रवींद्र धंगेकर, भोरचे संग्राम थोपटे यांच्यासारखे शेकडो युवा नेते काँग्रेसला राम राम का ठोकत आहेत, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक गावातील सरपंच, उपसरपंचांपासून ते माजी आमदारांपर्यंत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये एकगठ्ठा प्रवेश केला, ही घटना अगदी ताजी आहे.. आणि आता संग्राम थोपटे !
दूरदृष्टीहीन, कणाहीन, नेतृत्वहीन काँग्रेस..
काँग्रेसमधील या नवीन तरुण पिढीला काँग्रेसमध्ये काहीच ‘जान’ दिसत नाही, हे मूळ कारण आहे. एकीकडे भाजपामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी.. त्यांनी प्रत्येक गोष्टीत उचललेली विकासाची पावले दिसून येत आहेत, तर काँग्रेस मात्र अत्यंत ढिली, दूरदृष्टिहीन, कणाहीन आणि नेतृत्वहीन बनत चालण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. केंद्रातील नेतृत्व म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी ! मल्लिकार्जुन खर्गे हे अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडे पक्ष वाढवण्याची कल्पकता, क्षमता, वकूब आणि दूरदृष्टी मुळीच नाही, हे काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील माहीत आहे.
घराणेशाही एवढे एकमेव भांडवल..
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे फक्त घराणेशाही एवढेच भांडवल शिल्लक आहे. त्यात सोनिया गांधी आता सार्वजनिक कार्यक्रमातही दिसत नाहीत तर, राहुल गांधी हे दररोज काही ना काही तरी तारे तोडतात, ज्याचा पक्षावर उलटा परिणाम होत आहे. थोडक्यात काय, पक्षाला वेगाने पुढे नेईल, असे काहीच दिसत नसल्याने युवा पिढी संभ्रमात आहे आणि मग ती भाजपच्या मागे धावली तर दोष कुणाचा ? दुसरीकडे महाराष्ट्रामध्येही काँग्रेसकडे असा नेता दिसत नाही, की जो पक्षाला या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढेल आणि यशाची उत्तुंग शिखरे दाखवेल ! नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात ही आता संपलेली आणि चोथा झालेली नावे आहेत. सतेज पाटील किंवा विश्वजीत कदम अशी युवा पिढी जर चांगल्या पद्धतीने हाताळली नाही, तर संग्राम थोपटे किंवा रवींद्र धंगेकर यांच्या मार्गानेच ते गेले तर आश्चर्य वाटू नये !
टीका करणे एवढेच ‘लक्ष्य’..
काँग्रेस अजूनही आपल्याच धुंदीत वावरत आहे. शंभर वर्षांची परंपरा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा दृष्टिकोन या जुन्या आणि बुरसटलेल्या आठवणींमधून काँग्रेस पक्ष बाहेर येतच नाही. भारतीय जनता पक्षाने कोणतेही पाऊल उचलले, तर त्यावर टीका करणे एवढा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पक्षाच्या विकासाची दृष्टी सांगण्याची त्यांची इच्छाही नाही. थोडक्यात काय, भाजपा विकासाची दृष्टी म्हणजे होकारात्मक दृष्टी दाखवतो, तर त्यांची पावले कशी चुकीची हा नकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून काँग्रेसची पावले पडत आहेत !
हेही वाचा – पुण्यात पिंक ई-रिक्षा वाटप कार्यक्रम; अजित पवारांनी पुरुष प्रवाशांचे फोटो काढण्याचा महिलांना दिला सल्ला
राहुल गांधी असेपर्यंत अवघडच!
ज्या राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवून काँग्रेस पक्ष बिनधास्त आहे, त्या राहुल गांधींची बालिश वर्तणूक, त्यांचा अभ्यास, त्यांची भाषणे पाहिली तर ते भाजपाचे ‘ब्रँड अँबेसिडर’ असून भाजपालाच मदत करीत आहेत की काय? असे वाटते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका काँग्रेसने गमावल्या आहेत..दर वेळेला एक एक राज्य त्यांच्या हातून चालले आहे, तरी काँग्रेसचे डोळे कसे उघडत नाहीत ? ही बाब जास्तच चिंताजनक आहे.
उज्ज्वल भवितव्यासाठी सोडचिठ्ठी..
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला त्यावेळी स्पष्ट सांगितले, की काँग्रेसबद्दल आपल्याला काहीही बोलायचे नाही, पण उज्ज्वल भवितव्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आज काँग्रेस सोडणाऱ्या प्रत्येकाचे हेच म्हणणे आहे. आता, काँग्रेसबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हे अजून साडेचार वर्षे हलत नाहीत.. त्यात ते सत्तेची खुंटी जास्तच बळकट करत आहेत, म्हणजेच काँग्रेसमध्ये राहून, भवितव्य नसलेल्या विरोधी पक्षात बसून बाके बडवण्याशिवाय काहीही काम नाही, हे प्रत्येकाच्या लक्षात येत आहे.
संग्राम थोपटे यांचे म्हणणे..
काँग्रेसला नुकतीच सोडचिठ्ठी देणारे भोरचे संग्राम थोपटे काय म्हणतात, हे म्हणूनच महत्त्वाचे आहे. शून्य भवितव्य आणि मृतवत् अस्तित्व ही आता काँग्रेस पक्षाची खासियत बनली आहे, असे त्यांना सूचित करायचे असावे. मला काँग्रेसकडून कुठेही थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही. खरं तर, मला काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली आहे. एकेकाळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी याच काँग्रेसने संग्राम थोपटे यांचे नाव सुचवले होते, त्यांची आजची ही अवस्था, पुरेशी बोलकी आहे.
काँग्रेसकडून सतत अन्यायच..
थोपटे यांनी म्हटलं आहे, की २००९ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलो. तेव्हा मी नवीन होतो. त्यानंतर २०१४ ला आणि २०१९ साली पुन्हा निवडून आलो. तेव्हा ‘महाविकास आघाडी’ चं सरकार सत्तेत आलं. तेव्हा काँग्रेसला बारा मंत्रिपदं मिळाली होती. मला संधी मिळेल अशी भावना होती. पण, तेव्हा मला संधी मिळाली नाही. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हा मला वाटलं होतं, की मला संधी मिळेल. पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, पण तेव्हाही संधी मिळाली नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली आहे की पुण्यासारख्या जिल्ह्यात देखील तुम्ही तीनवेळा निवडून आलात, तरीदेखील तुम्हाला संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, माझ्यापुढे दुसरा पर्याय दिसत नाही, असे देखील त्यांनी ठासून सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी धंगेकर, आता थोपटे..
काही दिवसांपूर्वी माजी आमदार धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, हे त्यांचे नेते मान्य करत नसले तरी पक्षाला घरघर लागली आहे, हे सूज्ञ मतदाराला कळते.
हे नेते आपल्या मनात काय आहे ते कार्यकर्त्यांच्या तोंडी घालतात. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात. मात्र, प्रामाणिकपणे काम करत असतानाही पक्षानं तुम्हाला कायम डावलण्याचं काम केलं. मतदारसंघात तुम्ही विकासाची कामे केली, पण, अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची गळती सुरूच राहणार ?
काँग्रेस पक्षाला भवितव्य दिसत नसल्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गळती अशीच सुरू राहणार आहे. प्रत्येक वेळी एखादा नेता गेला म्हणून पक्ष संपला का? असा खडा सवाल त्यांचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विचारणार आहेत! जनतेला आता टोमणेबाजीचा कंटाळा आला आहे आणि समोर विकासकामे दिसत आहेत. एखादा नेता गेल्यामुळे पक्षाला काहीही फरक पडला नाही,असे उद्गार काढल्यामुळे उबाठा गटाची काय अवस्था झाली आहे, हे काँग्रेसचे नेते जवळून पाहत आहेत, पण त्यांची यत्किंचितही सुधारण्याची इच्छा नाही, अशा या मूर्खपणाला काय म्हणावे ?