चोक्सी, राणा जेरबंद, मल्याही येईल..दाऊदचा ‘ करेक्ट कार्यक्रम’ कधी ?
नीरव मोदी तसेच विजय मल्ल्या हे अद्याप परदेशात लपून बसले आहेत

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करून परागंदा होणाऱ्यांच्या यादीमधील मेहुल चोक्सी याला बे बेल्जीयम मध्ये जेरबंद करण्यात आले. त्याचा भाचा नीरव मोदी तसेच विजय मल्ल्या हे अद्याप परदेशात लपून बसले आहेत.
दाऊदला फरपटत कधी आणणार ?
मुंबईमध्ये २६/११ ला भयानक हिंसाचार घडवून आणून देशद्रोही कारस्थाने करणाऱ्या गॅंगचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारतात आणले, हे खरोखरच अभिमानास्पद आहे. सुनावणी होऊन त्याला शिक्षाही होईल, पण, सतत भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडणाऱ्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात खरपट कधी आणणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किती हल्ले, किती जणांना शिक्षा..
दुर्दैवाने गेल्या चाळीस वर्षात भारतात अक्षरशः शेकडो दहशतवादी हल्ले झाले आणि त्या सर्वांचे कोणी ना कोणी मास्टरमाईंड असल्याचे सुरक्षा यंत्रणांना लक्षात आले. हे मास्टरमाईंड त्यांच्या मास्टर प्लॅनप्रमाणे हल्ले घडवत आले. परंतु त्यातल्या फारच थोड्यांना शिक्षा होऊ शकली. कारण, या सगळ्या दहशतवादी मास्टर माइंडना पकडण्यासाठी आवश्यक ते उपाय करता आले नाहीत,ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल !
हिंसाचार घडवून पळून जायचे..
आतादेखील ज्या राणाला भारतात आणल्याचा गाजावाजा होत आहे. परंतु, त्याला पकडण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी लागला. भारतात हल्ले घडवायचे आणि परदेशात पळून जायचे, हा प्रकार पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा हा राणा मास्टर माइंड असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. पण त्याचा सुगावा आत्ता लागला आणि त्याला अमेरिकेकडून ताब्यात घेण्यात आले.
दाऊद हा तर दहशतवादाचा म्होरक्या..
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास जर बघितला तर तो कुख्यात दाऊद इब्राहिमपासून सुरू होतो. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील काळ्या साम्राज्याचा तो डॉन..मुंबईत दि. १२ मार्च १९९२ ला त्याने घडवलेले बारा साखळी बाँबस्फोट हा भारतातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा दहशतवादी कट म्हणता येईल ! भारताविरुद्ध छेडलेले छुपे युद्धच ते ! गेल्या २६ / ११ प्रमाणेच दाऊदने घडवलेल्या बारा बाँबस्फोटामागे मात्र जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लीम दंगे घडवून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षडयंत्र होते. अर्थात, २६/११ च्या हल्ल्यात जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला जवळपास वर्षभरानंतर फाशी दिले गेले, या आठवणी अगदी ताज्या आहेत.
राणाविरुद्धचा खटला जलदगती कोर्टात हवा..
आता या राणाविरुद्धचा हा खटला जलदगती कोर्टामध्ये चालला, तरच वर्षभरात त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. अन्यथा, तोपर्यंत त्याला सांभाळण्यात बराच खर्च केला जाईल. विशेष म्हणजे अमेरिकेतून त्याचे प्रत्यार्पण व्हावे, याकरिता गेली दहा वर्ष प्रयत्न चालू होता. त्यानंतर प्रत्यार्पणात यश मिळाले, असे म्हणता येईल.
भारत दहशतवादाने पोळलेला देश!
वास्तविक, दहशतवादाच्या या आगीमध्ये भारत हा सर्वाधिक पोळलेला देश ठरतो. स्थानिक पातळीवर भारताने हा दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेने कठोर पावले उचलली नाहीत, म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले. अगदी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेले हल्ले म्हणजे अमेरिकेच्या सत्ताधिशपणाला सर्वांत मोठा धक्का होता. ओसामा बिन लादेनने अतिशय योजनापूर्वक हा हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजे ज्या अमेरिकेला दहशतवादाचे धक्के बसलेले आहेत, त्या देशानेसुद्धा राणासारख्याच्या दहशतवाद्याचे प्रत्यार्पण करण्यात इतका विलंब लावावा, हे एक आश्चर्यच आहे.
दाऊदला आणा, कठोर शिक्षा द्या..
त्यामुळे भारताने आता स्वतः कठोर पावले उचलत गेल्या तीस चाळीस वर्षातल्या दहशतवादी हल्ल्यांचा जो खरा सुपर मास्टरमाईंड ठरतो, त्या दाऊद इब्राहिमलाही भारतात आणून शिक्षा केली पाहिजे. अगदी २६/११ च्या हल्ल्यातही दाऊदचा अदृश्य रोल होता. मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणची रेकी करण्यापासून ते स्थानिक मदत पोहचविण्यापर्यंत दाऊदने भूमिका निभावली होती. उशिरा का होईना,पण राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले असेल, तर याच मुंबईवरील हल्ल्यांचा सुपर मास्टरमाईंड असलेल्या दाऊदचे प्रत्यार्पण आता घडवून आणले पाहिजे. ते जर शक्य होत नसेल तर अमेरिकेने लादेनला ज्याप्रमाणे घुसून मारले, त्याप्रमाणे दाऊदलाही न्याय दिला पाहिजे.
हेही वाचा : ‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला
लोकल माईंडचाही बंदोबस्त करा..
राणासारखा मास्टरमाईंड जरी हाताशी लागला तरी हल्ल्यात स्थानिक पातळीवर मदतीचा हात देणारे लोकल माईंडही आहेत. त्यांचाही बंदोबस्त व्हायला हवा. राजकीय स्तरावर तर या दहशतवादी हल्ल्यांचे फायदे उठवण्याचाही प्रयत्न झाला. मग, अगदी २६/११ च्या हल्ल्याला भगवा दहशतवाद म्हणण्यापासून ते राणाला कायदेशीर ट्रायल मिळाली पाहिजे, अशी सहानुभूती व्यक्त करणारी विधाने राजकारण्यांकडून होऊ लागली आहेत.
सराईत राजकारणी आणि दहशतवाद
ज्यांनी नेहमीच दहशतवादाचा राजकीय वाद म्हणून वापर केला, काश्मिरमध्ये पोसला गेलेला दहशतवाद हा तर सराईत राजकारण्यांच्या छत्रछायेखाली पोसला गेलेला दहशतवाद होता. अमेरिकेतही कायद्याचेच राज्य आहे. तिथेही लोकशाही आहे. परंतु देशविरोधी कारस्थाने करणाऱ्याला वर्षभरात संपवले जाते. भारतातही कायद्याचे राज्य आहे. त्या संविधानाच्या चौकटीतच या दहशतवादाला दफन करणे अत्यंत गरजेचे ठरते. आता, जर याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत असेल, तर अजूनही पाकिस्तानमध्ये बसून भारतातल्या अनेक घडामोडींचे सूत्रसंचालन करणाऱ्या सुपर मास्टर माईंडला खेचून आणण्याची वेळ आलेली आहे. जर आता राणासारखा दहशतवादीही पकडला जाऊ शकत असेल, तर गेली अनेक वर्षे भारताला चकवा देणाऱ्या दाऊदचाहो हिशेब चुकता करण्याची हीच योग्यवेळ ठरू शकते. त्यात दाऊद हा लपून बसलेले घराची शहर हे पाकिस्तान महणजे दहशतवाद्यांचे आश्रयस्थानच आहे. ते अशा आरोपींचे प्रत्यार्पण करणार नाही, त्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत थेट घुसूनच सोक्षमोक्ष लावावा लागेल.. नरेंद्र मोदींना जर आपली प्रतिमा पूर्वीसारखीच आक्रमक ठेवायची असेल, तर दाऊदचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हीच वेळ आहे !