‘वाढत्या प्रदुषणामुळे मी मॉर्निंग वॉक बंद केला’; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI D Y Chandrachud | दिल्ली आणि एनसीआर येथील प्रदूषण हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर भारतातलं वातावरण बिघडलं आहे. हवेतील प्रदूषण वाढलं आहे. आता भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रदुषणाचा वाढता स्तर हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आपण वाढत्या प्रदूषणामुळे मॉर्निंग वॉक बंद केला आहे, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत असताना डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, की मी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो होतो. मला डॉक्टरांनी हवा प्रदूषित असल्याने मॉर्निंग वॉकला न जाण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी जर वॉक घेण्यासाठी तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला श्वास घेण्याच्या तक्रारी उद्भवतील. त्याऐवजी तुम्ही घरातच थांबा, तेच तुमच्यासाठी चांगलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.
डॉक्टरांनी मला सल्ला दिल्यानंतर मी आजपासूनच मॉर्निंग वॉक बंद केला. मॉर्निंग वॉकसाठी मी आता सकाळच्या वेळी बाहेर पडत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी मी पहाटे ४ ते ४.१५ च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जात असे चंद्रचूड म्हणाले.
हेही वाचा – निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
सर्वोच्च न्यायालयातील बातम्या करण्यासाठी जे पत्रकार येतात त्यांच्याकडे कायदा या विषयात शिक्षण घेतल्याची पदवी असलीच पाहिजे ही बाब अनिवार्य असणार नाही. तसंच पत्रकारांना लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात वाहन पार्क करण्यासाठीही जागा उपलब्ध करुन देऊ. न्यायालयीन प्रक्रियेचं डिजिटलायझेशन होतं आहे ही चांगली बाब आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी AI या तंत्रज्ञानाचा विचार केला जाईल असंही चंद्रचूड म्हणाले. डिजिटलायझेशन झाल्याने अनेक न्यायाधीशांना विमान प्रवासादरम्यान आयपॅडचा वापर करुन अनेक निर्णय वाचता येतात असंही त्यांनी सांगितलं. तसंच आपण लवकरच निवृत्त होणार आहोत आणि त्यानंतर काही काळ आराम करणार आहोत असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.





