तीन वर्षांत ‘मनरेगा’ची ८०० कोटींची कामे; दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाला प्रोत्साहन
नागपूर : दुष्काळावर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून राज्यात तीन वर्षांत सरासरी आठशे कोटींची कामे हाती घेण्यात आली. यापैकी चारशे कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. देशात दरवर्षी काही भागात दुष्काळ पडतो तर काही भागात अतिवृष्टीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळेच केंद्र सरकारने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी योजना हाती घेतल्या. यापैकी काही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून राबवल्या जातात. केंद्रीय जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यात २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत सरासरी ८०९ कोटींची कामे हाती घेण्यात आली. यापैकी ४९९ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत.
वर्ष पूर्ण कामे (खर्च) सुरू कामे (खर्च)
२०१९-२० १५१.९० ३९.१७
२०२०-२१ १८८.८६ ४०.५१
२०२१-२२ १३३.४७ ११७.५५
२०२२-२३ २४.९७ ११३.५५ (जुलै २२)
पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावा
जुलै २०१९ पासून देशात ‘कॅच द रेन’ या मुख्य घटकावर आधारित योजनांची अंमलबजावणी केली जाते. देशातील २५६ जिल्ह्यातील १५९२ गावांमध्ये जलशक्ती अभियान राबवले जाते. यातून अनेक ठिकाणी जलसंचय तयार होऊन पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमांतून राज्यांना निधी दिला जातो.





