विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान ४६.५ अंशांवर
चंद्रपूर:विदर्भात उष्णतेची लाट आली असून नागपुरात आज ४६.५ डिग्री तापमानाची नोंद घेतली गेली. त्या खालोखाल अकोला ४६, अमरावती व चंद्रपूर ४५.६ डिग्री तापमान नोंदविले गेले. तीव्र उष्णतेत लोकांनी घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना देण्यात आला आहे.
नागपूर, अकोला, अमरावती व चंद्रपूर या शहरांपाठोपाठ विदर्भात वर्धा ४५.५, गोंदिया ४५.४ तापमान नोंदवण्यात आले आहे. वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरीकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण आधीच आरोग्य यंत्रणेचा करोनासोबतचा लढा सुरू असल्याने तसेच आता येणाऱ्या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.





