भाजपचं महाविकास आघाडीविरोधात आंदोलन

मुंबई | महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत वाढत आहे. दरम्यान राज्यातील राजकारणही तापले आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत शुक्रवारी भाजपने ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलनास सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अनेक बडे नेते हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. तर सत्ताधारी काँग्रेसनं याला ‘भाजप बचाओ’ आंदोलन असं म्हटलं आहे.
तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. दरम्यान शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात यावं. केंद्राने जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याला दिली आहे, केंद्राच्या गॅरंटीवर महाराष्ट्राला एक लाख 60 हजार कोटी रुपये मिळू शकतात, असं गणित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मांडल आहे.
भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीविरोधात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. यावेळी फडणवीसांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर अंगणात आंदोलन केलं. केंद्राकडून 20 लाख कोटींच पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मात्र राज्य सरकारने एका रुपयाचंही पॅकेज दिलेलं नाही. राज्य सरकार अंग चोरुन काम करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नसल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे. केंद्राने 468 कोटी दिले, याशिवाय 1600 कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले, असा दावा विरोधापक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.





