कॉंग्रेस नेत्यांनी ही भीती घातल्यामुळेच सोनिया गांधी पाठिंब्यास तयार

नवी दिल्ली | महाईन्यूज
सत्तेत सहभागी नाही झालो तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल, अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती. या भीतीपोटी सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास मान हलवल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा सूर आळवला होता. मात्र परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षाशी हातमिळवणी करणं इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये अंगलट येईल आणि इभ्रत धुळीला मिळेल, अशी भीती गांधी कुटुंबाला सतावत होती.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा माजी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींची समजूत काढली. सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली, तर महाराष्ट्रातून काँग्रेसचं नामोनिशाण नष्ट होईल, ही भीती त्यांनी बोलून दाखवली. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने बातमी दिली आहे.





