कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा एक ऑगस्टपासून सुरू होणार
उजळाईवाडी – कोरोना प्रादुर्भावामुळे बंद पडलेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. याबाबची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.कोरोना महामारीमुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद पडली होती. त्यामुळे देशांतर्गत धार्मिक स्थळांना जोडणारी विमान कनेक्टिव्हिटी प्रवासी नसल्याने बंद पडली होती. सहाजिकच कोल्हापूर तिरुपती विमान सेवा देखील अपवाद राहिली नाही.
परंतु, आता देशात सर्वत्र बाजारपेठ खुल्या झाल्याने आता बहुतांशी सर्व धार्मिक स्थळे येत्या काही दिवसात पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोल्हापूर तिरुपती विमान सेवा देखील रविवार दिनांक एक ऑगस्टपासून पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या संदर्भात कंपनीचे कोल्हापूर व्यवस्थापक विशाल भार्गव यांच्याशी संपर्क साधला असता याला दुजोरा दिला. आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरू राहील असेही सांगण्यात आले आहे.