मोदींना माझा धोका वाटतो – राहुल गांधी
राहुल गांधी यांची टीका
बेंगळूरु – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्यापासून धोका वाटतो आहे. म्हणूनच आपण पंतप्रधानपदाची आकांक्षा व्यक्त केल्यावर मूळ मुद्दयांकडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच पंतप्रधानांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली, अशा शब्दामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. “युपीए’अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दलही राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. सोनिया गांधी जरी जन्माने इटलीच्या असल्या तरी अनेक भारतीयांपेक्षा अधिक त्या भारतीय आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधानांकडून वारंवार वैयक्तिक टीका का केली जाते असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेंव्हा जेंव्हा पंतप्रधानांवर टीका केली जाते तेंव्हा ते प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. ते दूर पळतात, असे राहुल गांधी म्हणाले. आपण पंतप्रधान बनायला तयार असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर “अशा अपरिपक्व नेत्याला देश पंतप्रधान म्हणून स्वीकारेल का.’ अशा शब्दात मोदींनी टीका केली होती.
सोनिया गांधी यांनी देशासाठी आपल्या आयुष्याचे मोल मोजले आहे. जेंव्हा मोदी सोनियांबाबत बोलतात, तेंव्हा त्यांची पात्रताच दिसून येते. त्यांच्या अशा वक्तव्याचे आपण स्वागतच करतो, असेही राहुल गांधी म्हणाले. कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी राहुल गांधी यांना कागद हातात न घेता 15 मिनिटे कोणत्याही भाषेतून भाषण करण्याचे आव्हान दिले होते.
कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या अखेरीस घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी गौतम बुद्धांच्या कथेतील संदर्भ दिला. मोदींचा राग त्यांच्याजवळ असल्याने त्या रागाचा आपल्यावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.