breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजितदादांसह ९ बंडखोरांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू’; जंयत पाटील

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपत घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून आता या नऊ जणांना अपात्र ठरवण्यासाठीच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी विधानसभेच्या सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनात जाऊन शपथ घेतल्याचं निदर्शनास आलं. आम्ही जे पाहिलं तेच महाराष्ट्राने पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शरद पवारांसोबत राहणार आहे हे स्पष्ट करण्याकरता पत्रकार परिषद घेतली आहे.

हेही वाचा – सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! देशात ‘या’ नियमांमध्ये मोठे बदल

काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वत:हून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने गटनेता या नात्याने ठामपणाने सांगतो विधिमंडळ काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करतंय. महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवारांसोबत राहिले, असं जयंत पाटील म्हणाले.

शपथ घेतलेले नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाविरोधात जाऊन त्यांनी केलेली कृती चुकीची असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button