इर्शाळवाडी शोध मोहीम थांबवणार, शोध मोहिमेत न सापडलेल्या व्यक्तींना मृत घोषित करण्याचा निर्णय, मंत्री उदय सामंतांची घोषणा
खालापूर : इर्शाळवाडी येथील सुरू असलेली शोध मोहीम आता उद्यापासून थांबवण्यात येत असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या दुर्टनेत बेपत्ता झालेल्यांना मृत घोषित करणार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. आता पर्यंत २७ मृतदेह सापडले असून उर्वरित न सापडलेल्या लोकांना मृत घोषित करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच बचावलेल्या १४४ लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल असे त्यांनी सांगितलं.
एकूण लोकसंख्या 228 पैकी 57 जण बेपत्ता आहेत. 27 मृतदेह मिळाले व 144 लोकांना एका मंदिरामध्ये सुरक्षित ठेवले आहेत. त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल एकूण 42 कुटुंबे होती. त्यापैकी 2 कुटुंबे पूर्णता उदवस्त झालेली आहेत. सिडकोद्वारे त्यांना घरे बांधून दिली जातील., अशीही माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत असून यंत्रसामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदत कार्य कठीण बनले आहे.
राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान,’ एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान मृतदेह व गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तिसऱ्या दिवशीही राबत होते. दुर्घटना होऊन तीन दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शनिवारच्या शोधकार्यात पिंकी संदेश पारधी (वय २५), नांगी किसन पिरकड (वय ५०), कृष्णा किसन पिरकड (वय २७), भारती मधू भुतांबरा (वय २२) आणि हिरा मधू भुतांबरा (वय १६) यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
जनावरे गमावल्याचे दुःख
इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटात अनेक ग्रामस्थांनी आपली जिवाभावाची जनावरेही गमावली आहेत. मातीच्या खाली आतापर्यंत चार बैल आणि तीन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्याच ठिकाणी खड्डा करून त्यांचे दफन करण्यात आले. कुटुंबीयांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत असलले ग्रामस्थ आपल्या अक्षरशः या सगळ्या घटनेने कोलमडून गेले आहेत.
श्वानांचे प्रयत्नही अपुरे
राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाच्या मदतीसाठी शेरू आणि जॅकी असे दोन श्वान आघाडीवर आहेत; परंतु १५ ते २० फुटांच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधून काढण्यात तेही कमी पडत आहेत. कोल्हापूरच्या ‘व्हाइट आर्मी’चे पथक पहिल्या दिवसापासून सापडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करत आहे.