#INDvsAUS 3rd test: स्मिथची शतकी खेळी; ऑस्ट्रेलियाची मजल तीनशेपार
सिडनी – आज सिडनी कसोटीतील दुसऱ्या दिवशी रविंद्र जाडेजा आणि बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. मात्र लाबुशनच्या ९१ धावा आणि स्टिव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली आहे.
आज सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी शानदार अर्धशतके झळकावत सामन्यावर पकड मिळवली. पहिल्या सत्राचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पाच गड्यांच्या मोबदल्यात २४९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी लाबुशेन-स्मिथ यांनी १०० धावांची भागिदारी केली. मात्र रविंद्र जडेजाने लागोपाठ दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. रविंद्र जडेजाने सुरुवातीला धोकादायक ठरत असणाऱ्या मार्नस लाबुशेन याला ९१ धावांवर माघारी धाडले. स्लिपमध्ये असणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणेने लाबुशेनचा सुंदर असा झेल घेतला. मग लाबुशेननंतर फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडलाही जडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलल. मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर दबात असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला जसप्रीत बुमराहने झटका दिला. बुमराहने युवा कॅमरुन ग्रीनला बाद केले. ग्रीनला भोपळाही फोडता आला नाही. मग लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 बाद 249 धावांपर्यंत मजल मारली. परंतु लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहने टीम पेनला (1) त्रिफळाचित करुन सामन्यावर भारताची पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजाने पॅट कमिंसला शून्यावर त्रिफळाचित केले. त्यानंतर नवदीप सैनीने धोकादायक बनू पाहणाऱ्या मिचेल स्टार्कला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. स्टार्कने एक षटकार आणि दौन चौकारांच्या सहाय्याने 30 चेंडूत 24 धावा फटकावल्या. मग जडेजाने नॅथन लायनला (0) पायचित करत भारताला नववं यश मिळवून दिले. त्यानंतर शतकवीर स्टिव्ह स्मिथला रवींद्र जडेजाने धावबाद केलं. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 338 धावा करून माघारी परतला.
दरम्यान, स्टिव्ह स्मिथने आज त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 27 वे शतक झळकावले. सिडनी कसोटीपूर्वी चार डावांमध्ये स्मिथ दोन अंकी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. पंरतु आज शतक झळकावून त्याने त्याचा फॉर्म सिद्ध केला आहे. स्मिथने 201 चेंडूत 13 चौकारांच्या सहाय्याने 102 धावा फटकावल्या. महत्त्वाचे म्हणजे आज दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणल्यामुळे दोन वेळा सामना थांबवण्यात आला होता. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली.