अतिश्रीमंतांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर
मुंबई | 2021 मध्ये जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कोरोना काळातही भारतात श्रीमंतांची संख्या सातत्याने वाढत आहे.
3 कोटी अमेरिकन डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या भारतातील अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत गेल्या वर्षी 11 टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ शेअर बाजारातील तेजी आणि डिजिटल क्रांतीमुळे झाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अहवालानुसार, भारतात हाय नेटवर्थ असलेल्या श्रीमंतांची संख्या 2021 मध्ये 13,637 होती, जी त्याच्या मागील वर्षी 12,287 होती. दरम्यान, अत्यंत श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक वाढ बंगळुरूमध्ये दिसून आली. तिथे त्यांची संख्या 17.1 टक्क्यांनी वाढून 352 इतकी झाली आहे. तर, त्यापाठोपाठ दिल्ली (12.4 टक्क्यांनी 210 वर) आणि मुंबई (9 टक्क्यांनी 1,596 वर) आहे.
तसेच अतिश्रीमंतांच्या यादीत 748 अब्जाधीशांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर 554 अब्जाधीशांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 145 अब्जाधीशांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.