आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमने-सामने… कधी आणि कुठे होणार हा सामना
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे महायुद्ध असते. त्यामुळे या सामन्याला जगभरात मोठा प्रतिसाद असतो. त्यामुळे सर्वांनाच आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेमका कधी होतो, याची उत्सुकता लागलेली होती. पण आता त्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी २६ ऑगस्ट या दिवशी आयबीएसए वर्ल्ड गेम्सच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारताचा अंतिम फेरीत मुकाबला हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या नऊ षटकांत २ बाद ६२ अशी चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली आणि बांगलादेशच्या फलंदाजांना हात उघडू दिला नाही. बांगलादेशकडून चांगली फलंदाजी करणारा आशिकुर रहमान 13व्या षटकात धावबाद झाला आणि त्यांची ३ बाद ८८ अशी अवस्था झाली. त्यानंतर एम आरिफ हुसेन आणि एस इस्लाम यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि ५६ धावांची भागीदारी केली. भारताने बांगलादेशला यावेळी १५० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही आणि शेवटच्या षटकात तीन विकेट घेत बांगलादेशला १४४ धावांपर्यंत रोखले. १४५ धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीचा धक्का बसला. कारण भारतीय संघाने तिसर्याच षटकात फक्त १७ धावा असताना त्यांची पहिली विकेट गमावली. यानंतर सुनील रमेश आणि नरेशभाई बाळूभाई तुमडा यांनी ६८ धावांची भागीदारी करत भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. भारताच्या १० षटकांत २ बाद ९० अशी धावसंख्या होती आणि शेवटच्या १० षटकांत त्यांना आणखी ५५ धावांची गरज होती. एनबी तुमडा आणि दुर्गा राव टोमपाकी यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि भारताने १७ षटकांत लक्ष्य गाठले.