यास चक्रीवादळाने धारण केलं अतिरौद्ररुप, ओडिशामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाला सुरुवात
मुंबई – अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्रासह अनेक जिल्हे सावरले नसताना बंगाल उपसागरांत आज यास चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज ओडिशामध्ये धडकणार असल्याने त्या भागात सोसाट्याचे वारे आणि अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याचे मुख्य संचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिनुसार मंगळवारीच सायंकाळी या चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं. चक्रीवादळ पोहोचण्याच्या सहा तास आधी आणि नंतर या भागामध्ये त्याचे गंभीर स्वरुपाचे परिणाम दिसून येतील अशीही माहिती त्यांनी दिली होती.
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून जवळपास 50 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. यास चक्रीवादळ पारादीपपासून 140 किमी अंतरावर, तर बालासोरपासून 220 किमी अंतरावर आहे. परिणामी इथं 150 किमी प्रतितास इतक्या वेगाहून जास्त सोसाट्याचे वारेही मोठं नुकसान करण्याची शक्यता असल्याचं म्हणत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे.
West Bengal | As #CycloneYaas nears landfall, sea turns rough at Digha in the Purba Medinipur district pic.twitter.com/ElQMQQ781S
— ANI (@ANI) May 26, 2021
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात सक्रिय असणारं यास हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत ते अतितीव्र श्रेणीपर्यंत (वाऱ्यांचा वेग अंदाजे ताशी 165 किमी) पोहोचेल. दुपारच्या सुमारास ते ओडिशातील बालासोरजवळ किनारपट्टी ओलांडेल असंही आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
चक्रीवादळाचे परिणाम फक्त ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येच नव्हे, तर इतरही राज्यांमध्ये दिसून येऊ शकतात. आसाम, मेघालय, झारखंड, बिहार या राज्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीवर दोन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवत सतर्कतेचा इशारा देत प्रशासन आणि बचाव पथकांना तत्पर राहण्याचा इशारा दिला आहे.