गडचिरोली जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
- आतापर्यंत १५ ग्रामस्थांचा बळी
गडचिरोली |
चंद्रपूरपाठोपाठ लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीबरोबर या जिल्ह्यात वाघ हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आठ महिन्यांत १५ ग्रामस्थांचा यात बळी गेला आहे. त्यामुळे एकतर वाघाला ठार मारा किंवा जेरबंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी के ली आहे.
७० टक्क्यांपेक्षा अधिक जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर नक्षलवाद्यांची दहशत होती. मात्र वर्षभरात वाघांचे हल्ले वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नरभक्षक वाघाने वन विभाग वडसा आणि गडचिरोलीच्या वनव्याप्त कार्यक्षेत्रात व शेतकरी बांधवांच्या शेतालगत जवळपास १५ ग्रामस्थांचे बळी घेतले. अनेक जण वाघाने के लेल्या हल्ल्यात जखमी झाले. गाई, म्हशी, बकऱ्या फस्त केल्या. ज्यामुळे संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीत आहे. शेतकऱ्यांनी शेतावर जाणे बंद केले. नागरिक घराबाहेर पडायला भीत आहेत. त्यामुळे वाघाला जेरबंद करा किं वा ठार मारा, या मागणीसाठी आता ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. वाघाच्या बंदोबस्ताकरिता भारतीय जनसंसद या संघटनेच्या वतीने ठिय्या व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वाघ आणि मानव संघर्ष थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने सरकारकडे के ल्याचे जिल्हा सरचिटणीस भाई रामदास जराते यांनी सांगितले. वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबातील एकाला तात्काळ वन विभागात नोकरी देण्यात यावी. जखमींना आर्थिक मदत द्यावी, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे व्यापारीकरण (हॉटेल, रिसॉर्टच्या बेसुमार परवानग्या) थांबवण्यात यावे. वन्यजीवांना होणारा त्रास थांबवण्यावर उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात कोरची, धानोरा, एट्टापल्ली, भामरागड, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी राहत असल्याने आणि याच तालुक्यांमध्ये वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीव आहेत. त्यामुळे आदिवासी व वन्यजीव यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. कोरची आणि एट्टापल्ली तालुक्यातील १४ हजार ९५० हेक्टर जंगलावरील बेकायदा मंजूर आणि प्रास्तावित लोह खाणी ताबडतोब रद्द कराव्या, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत.
- व्याघ्र मोहीम १२ गावांमध्ये
वाघाला पकडण्यासाठी १२ गावांमध्ये मोहीम राबवण्यात येत आहे. पोर्ला वन परिक्षेत्राच्या चार कंपार्टमेंटमध्ये पन्नास कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेरा ट्रॅप आणि पगमार्क यावर लक्ष ठेवले जात आहे. एकूण २४ कर्मचारी, दोन शूटर्स कार्यरत आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी कौशिक यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. चार दिवसांत दहा गावांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली असून दररोज वीस किलोमीटर पायदळ प्रवास करून मोहीम सुरू आहे.
- ‘एनटीसीए’ची दोन पथके गडचिरोलीत
या जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री अश्विनीकुमार चौबे यांची भेट घेऊन व्याघ्रहल्ल्यात पंधरा जणांचा बळी गेल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर एनटीसीएची दोन पथके वाघाला जेरबंद करण्यासाठी पाठवण्यात आली आहेत. सध्या गडचिरोलीत वाघाला पकडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
- वाघाचा बंदोबस्त करा
गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरक्षक वाघाचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, वन विभागाने गांभीर्याने हा प्रश्न हाताळावा व लोकांच्या मनातील भीती कमी होईल यासाठी कृती करावी. – विजय खरवडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनसंसद
- नागरिकांना जंगलबंदी
वाघाचा धुमाकू ळ वाढल्याने पुढील १५ दिवस जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये. गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, दिभणा, गोगाव, जेप्रा, पिपळ टोला, नवरगाव, दिलोडा, अमिर्झा, बोथेडा या गावांमधील तसेच आजूबाजूच्या १५ गावांना जंगलात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. – संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली