TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

वातानुकूलित लोकलच्या आधी व नंतर धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांमधील गर्दीत प्रचंड वाढ

मुंबईः वातानुकूलित (एसी) लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द होत असल्याने वातानुकूलित लोकलच्या आधी व नंतर धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांमधील गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकल फेऱ्यांना विलंब होत असून, वातानुकूलित लोकल फेऱ्या नकोत, अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी-कल्याण या एसी लोकलमुळे यानंतर धावणाऱ्या धीम्या लोकलला प्रचंड गर्दी होते. परळमध्येच ही गाडी प्रवाशांनी भरून जात असल्याने दादर स्थानकात प्रवाशांना या गाडीत प्रवेशच मिळत नाही. यामुळे वातानुकूलित लोकल धीम्या मार्गावर चालवू नयेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सीएसएमटीहून रात्री साडेआठ वाजताची जलद ठाणे लोकलही वातानुकूलित करण्यात आली आहे. या जलद लोकलनंतर असलेल्या खोपोली, अंबरनाथ, कसारा या लोकल फेऱ्यांना तुडुंब गर्दी होते. वातानुकूलित लोकलमुळे दोन गाड्यांची गर्दी एकाच गाडीला होत आहे. परिणामी ही जलद लोकल अनेकदा भायखळा स्थानकातच प्रवाशांनी पूर्ण भरून जाते. यामुळे जलद मार्गावर सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालवू नयेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या वातानुकूलित लोकलच्या ६६ फेऱ्या होतात. यापैकी ३४ फेऱ्या या अतिरिक्त आहेत. उर्वरीत ३२ फेऱ्या धीम्या-जलद मार्गावरील सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येत आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांना वातानुकूलित लोकलचा प्रवास परवडत नाही. सामान्य लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचे तिकीट व पास प्रचंड अधिक आहे. सामान्य लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल चालवू नयेत, या मागणीसाठी प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांची भेट घेतली. वातानुकूलित लोकल फेऱ्या अतिरिक्त स्वरूपात असाव्यात. एसी लोकलमुळे सामान्य लोकल फेऱ्या रद्द झाल्यास अनेक रेल्वे स्थानकांत प्रवाशांचे उग्र आंदोलन होईल, असा इशारा प्रवासी संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान दिला.

आव्हाड यांची रेल्वे व्यवस्थापकांशी चर्चा
वातानुकूलित लोकलप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ते आणि प्रवाशांसह रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेतली. ‘कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावावे’, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. परंतु आज केवळ वातानुकूलित लोकलवर चर्चा करावी, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी वातानुकूलित लोकलला तीव्र विरोध दर्शवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button